सातारा -सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील सुमारे 47 पाणी पुरवठा योजनांना फटका बसला असून काही पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या वाहून गेल्या तर काही ठिकाणी विहीरी गाळाने भरल्या आहेत. विद्युत पंप गाळात रुतले आहेत. पाणी पुरवठा योजनांचे सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोट्यवधींची हानी झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे.
आधीच करोनाचे संकट त्यात अतिवृष्टी आणि परत परतीचा पाऊस अशा संकटांमुळे मोठे नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांसह पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. गावोगावच्या पाणी पुरवठा योजनांना या पावसाचा फटका बसला आहे. पाटण तालुक्यतील जांबेकरवाडी येथील टाकी व गुरूत्वनलिकेचे सुमारे 1 लाख 50 हजार रुपये, जमदाडेवाडी येथील दाब नलिकेचे 2 लाख रुपये, पाचगणी नागवणटेक येथील विहिर व पंपदुरूस्तीचे 3 लाख 50 हजार रुपये, पेठशिवापूर येथील विहिर व पंपदुरूस्तीचे 2 लाख 50 हजार रुपये, नाटोशी देसाई वाडा येथील टाकी व वितरण व्यवस्थेचे 2 लाख रुपये, म्हाळुंगेवस्ती शिवंदेश्वर दाबनलिका व वितरण व्यवस्थेचे 3 लाख रुपये असे मिळून 6 कामांचे 14 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथील विहिर दुरुस्तीसाठी 15 लाख 28 हजार रुपये, मांघर येथील संरक्षण भिंतीचे 25 लाख रुपये, कळमगाव येथे आरसीसी बैठी टाकीचे 3 लाख रुपये, आमशी येथे आरसीसी बैठी टाकीचे 3 लाख रुपये, भेकवली आरसीसी बैठी टाकीचे 3 लाख रुपये, कुमठे येथील विहीरीच्या दुरूस्तीसाठी 4 लाख 50 हजार रुपये, देवळी येथील विहीरीच्या दुरूस्तीसाठी 15 लाख रुपये, घावरी महारोळे येथील विहीरीच्या दुरूस्तीसाठी 20 लाख रुपये असे मिळून 8 पाणी पुरवठा योजनांचे 88 लाख 78 हजार रुपयांचे नुकसान झाले.
कोरेगाव तालुक्यातील भाकरवाडी येथील दाबनलिका दुरूस्तीचे 9 लाख 85 हजार रुपये, बोबडेवाडी येथील दाबनलिका दुरूस्तीचे 10 लाख रुपये असे मिळून दोन पाणी पुरवठा योजनांचे 19 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले. जावली तालुक्यातील मार्ली येथील विहिर दुरूस्तीसाठी 9 लाख 40 हजार रुपये, रेंगडी येथील विहिर दुरूस्तीसाठी 7 लाख 50 हजार रुपये, मुकवली (वातांबे) येथील
गुरूत्वनलिका दुरूस्तीसाठी 5 लाख रुपये असे मिळून 3 पाणी पुरवठा योजनांचे 21 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले.
फलटण तालुक्यात जोर पुनर्वसन पाईपलाईनचे 4 लाख रुपये, दुधेबावी येथील पाईपलाईनचे 90 हजार रुपये, सरडे येथील पाईपलाईनचे 50 हजार रुपये, राजाळे (जानाई मंदिर शेजारी) विहीरीतील गाळ काढण्यासाठी 50 हजार रुपये, राजाळे गुजरमळा येथील विहीरीतील गाळ काढण्यासाठी 50 हजार रुपये, कांबळेश्वर भिवाई येथील पाईपलाईन दुरूस्तीसाठी 5 लाख रुपये असे मिळून फलटण येथील 9 पाणीपुरवठा योजनांचे 13 लाख 38 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कराड तालुक्यातील अकाईचीवाडी येथील पाईपलाईन दुरूस्तीच्या कामासाठी 1 लाख रुपये, ओंड येथील पाईपलाईन दुरूस्तीच्या कामासाठी 3 लाख 50 हजार रुपये, तांबवे येथील संरक्षण भिंतीचे 15 लाख रूपये असे मिळून 3 पाणी पुरवठा योजनांचे सुमारे 19 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. सातारा तालुक्यातील गजवडी येथील विहिर बांधकाम व विहीरीतील गाळ काढण्यासाठी 13 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 47 पाणी पुरवठा योजनांचे सुमारे 2 कोटी 81 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. पाणी पुरवठा योजनांचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून शासनाने दुरुस्तीसाठी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.