नगर -नगर शहरात आजवर “त्यांनी’ केवळ जातीय तेढ निर्माण करुन स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. करोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून नगर शहरातील मुस्लिम देखील प्रयत्न करत आहेत. मात्र, करोनाच्या संकटात देखील त्यांना केवळ राजकारणत आणि जातीयवादच दिसतो, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहर-जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी केली आहे.
नगरमध्ये अजानच्या मुद्यावर शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह ऍड. अभय आगरकर, वसंत लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. नगरमध्ये अजानला परवानगी दिलीच कशी, असा सवाल या नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जहागीरदार यांनी शिवसेना नेत्यांवर पलटवार केला आहे.
अजानच्या परवानगीच्या मुद्दयास जातीयवादी रंग देऊन दोन समाजांत द्वेष पसरवीत असल्याचा आरोप जहागीारदार यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख एकीकडे करोनाच्या संकटकाळात कडवी झुंज देत आहेत. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार अजूनही येथील उपनेते जातीयवादी राजकारणात अडकले आहेत, याचा खेद वाटतो.
शहरात करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मुस्लिम समाज देखील शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करीत आहे. शहर सध्या ऑरेंज झोनमध्ये असून, काही प्रमाणात सवलती मिळत आहेत. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. तरी देखील संकटकात आणखी वाढ नको म्हणून मशिदी बंदच आहेत. मुस्लिम बांधव उपवास करुन नमाज पठण घरात करत आहे.
उपवास सोडण्याची वेळ समाजावी म्हणून मोजक्याच मशिदीतून आजानला परवानगी देण्यात आली आहे. मशिदीत फक्त एकच व्यक्ती अजान देत आहे. अन्य कोणीही मशिदीत जात नाही. त्यामुळे याचे राजकारण करण्याचा प्रश्नच नव्हता, अशी भूमिका जहागीरदार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या या शिवसेना उपनेत्यांचा नगर शहरातील मुस्लिम समाज निषेध करत असल्याची भूमिका जहागीदार यांनी मांडली आहे.