मुंबई : अजित पवार यांच्या सिंचन प्रकरणातील भ्रष्टाचाराचे खंडीभर पुरावे आहेत, असे सांगणाऱ्या नेत्यांनी ते पुरावे रद्दीत विकले की, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.
माझ्यासारख्या आणखी नेत्यांचा प्रचारात पक्षाने वापर करून घेतला असता तर पक्षाच्या आणखी 20-25 जागा सहज निवडून आल्या असत्या, अशी टीका पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली. विधान भवनाच्या परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.
खडसे यांना 2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रीमंडळातून वगळण्यात आले होते. ते म्हणाले, मी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि अन्य काही नेत्यांना प्रचारापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. त्याची पक्षाला किंमत मोजावी लागली. आणखी 20-25 जागा निवडून आल्या असत्या तर तर पक्षाची स्थिती वेगळी असती. पक्षाला विरोधात बसायची गरज भासली नसती.
महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याचे गाडीभर पुरावे असल्याचे भाजपा नेते सांगत होते, त्या बद्दल काय म्हणाल, असे विचारता, खडसे म्हणाले, तर पुरावे रद्दीत विकले. तुम्हाला माहित नाही काय?
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. त्यात शिवसेनेला 56 तर भाजपाला 105 जागा मिळाल्या. त्यानंतर अजित पवार पक्षात बंड करून भाजपाशी हातमिळवणी केली होती. मात्र, आमदारांचा अपेक्षित पाठींबा ते मिळवू शकले नाहीत. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने खुले मतदान घेण्याचे आदेश दिल्याने अजित पवार स्वगृही परतले. त्यामूले आपण बहुमत सिध्द करू शकत नसल्याचे लक्षात येताच फडणवीस यांनी राजीनामा दिला.