सातारा – आपण लोकशाही असणाऱ्या देशात राहतो आणि लोकशाहीच्या प्रक्रियेला मानतो. त्यामुळे अफजलखान कबर प्रकरणात राज्य सरकारने अतिक्रमण हटवण्याची केलेली कारवाई योग्यच आह.े या प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय रंग देणे चुकीचं आहे, अशी रोखठोक पहिली प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
शिंदे आणि फडणवीस सरकारने गुरुवारी गनिमी काव्याने प्रतापगडच्या पायथ्याला असणाऱ्या अफजलखान कबर परिसरातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले. त्या कारवाईनंतर दिवसभर उदयनराजे भोसले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी जलमंदिरात त्यांनी चहापानानिमित्त उदयनराजे यांची भेट घेतली. त्यावेळी उदयनराजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुरलीधर मोहोळ, नरेंद्र पाटील, विक्रम पावसकर, अतुल भोसले, सुनील काटकर, विकास गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे आणि उदयनराजे यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर उदयनराजे भोसले म्हणाले, “”अनेक संघटना अफजलखान कबर पूर्णपणे हटवण्याची मागणी करत आहेत. मात्र, तसं होऊ शकत नाही. कारण शिवाजी महाराजांनी काही विचार करूनच ही कबर बांधली असावी. महाराजांनी स्थापित केलेली मानवी मूल्य आहेत त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर सर्वांना मानसन्मान दिला. महाराजांनी त्यांच्या शत्रूसाठी देखील कबर बांधली. आपल्या शत्रूसाठी असे आजवर कोणीही केले नाही. मात्र, या कबरीभोवती मागील काळात काही लोकांनी अतिक्रमण केलं. हे अतिक्रमण तोडून ही कबर खुली करायला हवी. पुढच्या पिढ्यांना या कबरीचा इतिहास कळायला हवा.” अफजलखान मुस्लिम होता म्हणून ही कारवाई केली असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये, असे उदयनराजे यांनी स्पष्टपणे बजावले.
“जगदंबा तलवार भारतात यावी’
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंग्लंडमधील छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले, “जगदंबा तलवार भारतात यावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. ब्रिटिशांनी दुसऱ्या देशातून आणलेल्या वस्तू मोठे मन दाखवून त्या देशांना परत द्यायला हव्यात.’ या पत्रकार परिषदेनंतर जलमंदिर ते जिल्हा परिषद बहुउद्देशीय सभागृह अशी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या बुलेटवर चंद्रशेखर बावनकुळे स्वार झाले आणि त्यांच्यामागे उदयनराज ेबसले. ही रॅली पोवई नाक्यावरून थेट जिल्हा परिषदमार्गे जिल्हा परिषदेच्या मैदानावर नेण्यात आली. या रॅलीची साताऱ्यात जोरदार चर्चा झाली.