मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात अगोदरच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना राज्यसभेवर महाविकास आघाडी सरकारचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास दिला आहे. दरम्यान, आज औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेकडून या सभेला ‘हुंकार सभा’ म्हणून संबोधले गेले आहे. दरम्यान, या सभेवरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी आज सकाळी एक ट्विट केले. त्यात त्यांनी “आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.” असे म्हटले आहे. तसेच, राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली.
राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमच्या दोन सदस्यांनी मतदान करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर मदत मागितली तर विचार करू असे, असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर देखील संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2022
“तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे.” असे संदीप देशपांडेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.