पुणे : राज्यात सगळेचजण मान्सून अर्थात मोसमी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पण, नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा प्रवाह अरबी समुद्रात कमकुवत झाल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही दिवस मान्सून पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार केरळ किनारपट्टीवर मान्सून 26 मे रोजीच दाखल झाला. पण, त्यापुढील प्रवास संथ सुरू असून मागील चार ते पाच दिवसांपासून कर्नाटकच्या कारवारपर्यंतचा प्रदेश नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी व्यापल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. तर, विदर्भात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मंगळवारी गोंदिया जिल्ह्यात उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.