पुणे – शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या जुगलबंदीमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. दररोजच आरोप-प्रत्यारोप होतायत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आव्हान दिल्यानंतर भाजपकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विधानावरून पाटील यांनी निशाणा साधला आहे. मी नीलम ताईंबद्दल काही बोलत नव्हतो ते बोलावं लागेल . त्यांना जाणीव असावी त्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. ज्यावेळेला तुम्ही विधानपरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष असता त्यावेळेला तुमचा कोणताही पक्ष नसतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तुमचाही सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी भाजपला थेट इशारा दिलं होतं.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, निलमताई उपसभापती असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून बोलणार असतील तर मी कोर्टात जाईल. महाराष्ट्रात सगळे पायंडे मोडीत काढले जात आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती असणं हे अतिउच्च स्थान आहे, तुम्ही त्याची गरिमा बिघडवू नका. तुमच्याकडे सातबारा असेल, पुरावे असतील तर कश्याला धमक्या देता, कोर्टात जा कोण घाबरतय. ही पूर्वीची बीजेपी नाही राहिली, खूप स्ट्रॉग झाला, असही पाटील म्हणाले.