नवी दिल्ली, दि. 6- करोना देशात वेगाने पसरण्याचे कारण म्हणजे देशात पाच राज्यांतील निवडणुकांसह कुंभमेळ्याला जबाबदार धरले जात आहे. मात्र, याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
आम्ही करोनाला गांभीर्याने घेतले नाही. तसेच आम्ही तयारी केली नव्हती असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी हा व्हायरस वेगाने पसरला असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, थोड्या वेळासाठी विचार करा की जर सरकारने असे म्हटले असते की निवडणूक होणार नाही तर काय प्रतिक्रिया समोर आल्या असत्या? तसेच कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनामध्ये गर्दीमुळे करोना पसरल्याच्या आरोपावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, आम्ही एका वर्षापूर्वी देशभरात लॉकडाऊन केला होता जो खूप गरजेचा होता कारण त्यावेळी करोनाशी लढण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार नव्हतो. मात्र, आता आहोत.
दरम्यान, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केले आहे. भारतात करोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि करोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवे.