सिंगापूर – पाकिस्तानमधून दहशतवादाला प्रोत्साहन देणे हा जवळपास उद्योग पातळीवर सुरू असल्याची टीका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. पाकिस्तानच्या या उद्योगाकडे भारतातून आता दुर्लक्ष केले जाणार नाही. भारत आता या उद्योगावर पांघरुण घालणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तीन दिवसांच्या सिंगापूर भेटीवर आहेत. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील इन्स्टिट्युट ऑफ साऊथ एशियन स्टडीजमध्ये जयशंकर यांच्या व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाच्या अनुषंगाने त्यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
प्रत्येक देशाला किमान शांत, स्थिर शेजारी हवा असतो. मात्र दुर्दैवाने भारताला तसा शेजारी मिळालेला नाही. पाकिस्तान भारताविरोधात नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन देत असतो. दहशतवाद हे एक शस्त्र म्हणून वापरल्याचे जर एखादा देश लपवत देखील नसेल, तर त्याच्याशी कसे वागायला हवे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पाकिस्तानचे हे काम जवळपास एखाद्या उद्योगासारखे सुरू आहे. त्यामुळे हा उद्योग करणाऱ्याशी काहीही संबंध न ठेवणे, हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो, असेही जयशंकर म्हणाले.