नवी दिल्ली, दि. 6- काही महिने शांततेत गेल्यानंतर चीन सीमेवर पुन्हा आक्रमक हालचाली करू लागला आहे. चिनी सैन्याच्या हालचाली सुरू होताच भारतीय सैन्य सतर्क झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे स्वतःच्या हद्दीत चीनने नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे अशा प्रकारे चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने भारताच्या हद्दीत नव्याने कुठेही अतिक्रमण केलेले नाही. मात्र, चिनी हालचालींवर भारताचे बारीक लक्ष आहे.
जून महिन्यातील गलवानच्या घटनेनंतर भारत आणि चीन यांच्या कमांडर पातळीवर 9 वेळा चर्चा झाली. चिनी सैन्याने माघारीचे आश्वासन दिले. पण ताज्या घडामोडींमुळे चीनच्या हेतूंबाबत भारतीय सैन्याच्या मनात शंका निर्माण झाली आहे. चीनने स्वतःच्या हद्दीत ठिकठिकाणी मोठ्या संख्येने हेलिपॅड, शस्त्रसाठाची गोदामे, आकाशातील लक्ष्याचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे, धावपट्टी अशी निर्मिती सुरू केली आहे.
मागच्या वर्षी कच्च्या बांधकामाच्या स्वरूपात केलेली निर्मिती या वर्षी पक्की आणि आणखी भक्कम करण्यावर चिनी सैन्याकडून भर दिला जात आहे. सीमेवर मोठ्या संख्येने सैनिकांना आणणे सोपे व्हावे यासाठी स्वतःच्या हद्दीत भक्कम रस्त्यांच्या निर्मितीला चीनने चालना दिली आहे. रूतोग कंट्री भागात स्वतःच्या हद्दीत चिनी सैन्याच्या हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत. चीनच्या हालचालींवर भारत लक्ष ठेवून आहे.