अहमदाबाद – चीन सातत्याने अरूणाचल प्रदेश या भारतीय भूभागावर आपला दावा सांगतो आहे. अलिकडेच त्यांनी अरूणाचलमधील विविध ३० भागांची चीनी भाषेतील नावांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पाश्र्वभूमीवर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी कठोर शब्दांत चीनला फटकारले आहे.
चीनने पुन्हा पुन्हा असले प्रकार करणे निरर्थक असल्याचे सांगताना जयशंकर म्हणाले की हा मूर्खपणाचाच प्रकार आहे. अरूणाचल प्रदेश हा भारताचाच भाग आहे आणि भारताचाच राहणार आहे. माझा हा संदेश केवळ देशातीलच नाही तर देशाबाहेरील लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचला असेल.
दरम्यान, व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून असणाऱ्यांसाठी दीर्घकालीन योजना काय आहे असे विचारल्यावर जयशंकर म्हणाले ही केवळ गुजरातची समस्या नाही तर संपूर्ण भारताचीच काय संपूर्ण जगाची समस्या आहे. तांबड्या समुद्रात दोन गोष्टी घडत आहेत.
काही शक्ती ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे जहाजांवर हल्ला करत आहेत. सोमालियात समुद्री डाकू जहाजांवर कब्जा करत आहेत. त्याचे कारण त्यांना वाटते जगाचे लक्ष ड्रोन आणि क्षेपणास्त्रांकडे असल्यामुळे ही आपल्यासाठी एक संधी आहे.
भारतासाठी ही अधिक चिंतेची बाब असण्याचे कारण म्हणजे या मार्गांवरील जहाजांच्या नाविक दलाचे बहुतांश कर्मचारी हे भारतीय असतात. त्यांच्या सुरक्षेबद्दल आम्ही चिंतीत आहोत.