नवी दिल्ली – युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेची पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्र्याकडून बढाई मारली जात आहे. या विषयावरून राजकारण करणे बरोबर होणार नाही अशी टिका माजी मंत्री जयराम रमेश यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.
याआधीही कोणताही प्रचार न करता तसेच धामधूम न करता लोकांना परदेशातून परत आणण्यात आले आहे. 2011 साली लिबियामधून जवळापास 15,000 भारतीयांना परत आणण्यात आले होते. 2006 मध्ये लेबनॉन या देशातून 2,300 भारतीयांना मुक्त करण्यात आले होते. 1990 मध्ये तर तब्बल 1 लाख 70 हजार नागरिकांना भारतात सुखरुपपणे परत आणण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी कोणताही तमाशा केला नव्हता, अशा शब्दात जयराम रमेश यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही थांबलेले नाही. या युद्धामुळे वेगवेगळ्या देशातील नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतातील अनेक नागरिक तसेच वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थीदेखील युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या सर्वांना युद्धभूमीवरुन भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. मात्र याच मोहिमेवरुन कॉंग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारत सरकारतर्फे ऑपरेशन गंगा राबवले जातेय. त्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांची एक टीम नियुक्त करण्यात आलीय. मंत्र्यांची ही टीम तसेच बचाव पथकाच्या मदतीने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात यश आलंय. भारतात परतल्यानंतर काही मंत्री या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे स्वागत करत असल्याचेही व्हिडीओ समोर आले आहेत. याच मुद्द्याला घेऊन जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी तसेच भारत सरकारवर वरील टीका केली आहे.