IPL 2024, Mumbai Indians :- आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील सलग तीन सामने गमावले आहेत. यंदाची स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याची रोहित शर्माच्या जागी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेतच. पण यासोबतच पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघाची कामगिरीही सुमार होत आहे. संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबईचे कर्णधारपद पंड्याकडून पुन्हा रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते, असे मत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने व्यक्त केले आहे.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या मुंबईच्या पराभवानंतर तिवारीने हे मत मांडले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अत्यंत निराशाजनक सुरुवात केल्यानंतर रोहितला पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार बनवले जाऊ शकते. राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या डावात मुंबईला ९ बाद १२५ धावांवर रोखले आणि ६ बळी आणि २७ चेंडू बाकी असताना १२६ धावांचा सहज पाठलाग करत विजय मिळवला. पंड्याच्या नेतृत्वाखाली, मुंबईला गुजरात आणि हैदराबादविरुद्ध अनुक्रमे ६ धावांनी आणि ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचे कर्णधारपद पुन्हा रोहितकडे सोपवले जाऊ शकते.
मुंबई इंडियन्सचे मालक हा निर्णय घेण्यास अजिबातच कचरणार नाहीत. रोहितच्या नावे पाच आयपीएलची विजेतेपदे असतानाही त्यांनी रोहितकडून कर्णधारपद काढून घेत पंड्याला देण्याचा निर्णय घेतला होता. संघाचा कर्णधार बदलणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या मोसमात त्यांनी अद्याप एक गुणही आपल्या खात्यात जमा केलेला नाही.
IPL 2024 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक झाला बदल, ‘या’ सामन्यांच्या बदलल्या तारखा; जाणून घ्या कारण….
संघाचे नेतृत्त्व पाहता असे ही नाही की कर्णधार नेतृत्त्व चांगले करतोय पण नशीब साथ देत नाहीये. मुळात संघाचे नेतृत्व योग्य होताना दिसत नाही, असेही तिवारी म्हणाला. मुंबई इंडियन्सचा आता पुढील सामना ७ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावरच होणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मुंबईचा संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.