पुणे – शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा 75 हजार नोकर भरती केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मंगळवारी (दि.20) त्यांनी बंड करून एक वर्ष होईल. त्यांचे सरकार येऊन एक वर्ष झाले आहे. त्यांनी वर्षभरात किती लोकांना नोकऱ्या दिल्या? किती महागाई कमी केली, किती शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळवून दिली, किती शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या, त्याबाबत आधी बोला, असे जाहीर आव्हानच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.
तसेच कोणताही घटक आजच्या घडीला या सरकारच्या कामाबाबतीत समाधानी नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. शहरात एका बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, आज पावसाने ओढ दिली आहे. अमरावती, कोकणात पाऊस नाही. धरणातील साठे संपत चालले आहेत. प्यायला पाणी नसल्याने प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
दुबार पेरणीचे संकट आहे. खतांच्या किंमती वाढत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात माल साठवून पडला आहे. उत्पादनाला भाव मिळत नाही. जळगावातील काही शेतकरी उपोषणाला बसले होते. या सर्व समस्या आहेत. यावर सरकारने बोलावे. राज्यात आणि केंद्रात तुम्ही आहात, या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली तर जनतेला दिलासा मिळेल, असेही पवार म्हणाले.