विनोद मोहिते
इस्लामपूर – यंदाचा महापूर, चाऱ्याची टंचाई व बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे इस्लामपूरच्या संभूआप्पा ऊरसात भरणारा ऐतिहासिक बैलबाजार लोप पावत आहे. यापूर्वी बाजारात तब्बल एक लाखापेक्षा जास्त जनावरे दाखल व्हायची; परंतु यंदा अवघी शे-दोनशे जनावरे दाखल झाली आहेत. या बाजारात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येक वर्षांपासून या बाजारात येणारे फिरते विक्रेते यंदा फिरकलेच नाहीत.
इस्लामपूरच्या पश्चिमेला ख्रिश्चन बंगला परिसरात व पेठ नाक्यापर्यंत मोकळ्या जागांमध्ये जनावरे बांधली जायची. कधी काळी लाखो जनावरांनी समृद्ध असलेला हा बाजार महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकातही प्रसिद्ध होता. जातिवंत म्हशी, गायी, बैल आदी जनावऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकरी या बाजाराला पसंती द्यायचे. जनावरांसाठी लागणाऱ्या साहित्याचे स्टॉल आणि हॉटेल व्यावसायिकांची रेलचेल असायची.
बाजार पंधरा दिवस चालत असल्याने शेतकरी जनावरांना पुरेल इतका चारा सोबत आणायचे. यंदा दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापूर अशा विरोधाभासी नैसर्गिक आपत्तींमुळे चाऱ्याचे प्रमाण घटले आहे. हे लक्षात घेऊन बाजार समितीने चारा उपलब्ध करायला हवा, असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे घटत असलेले पशुधन आणि अतिवृष्टीचा या बाजारावरही परिणाम झाला आहे.
रंगराव सलगर म्हणाले, पावसाळ्यात अनेकांनी जनावरे स्थलांतरित केली. ती पुन्हा घरी न आणता त्यांना बाजार दाखवला. कवठेमहांकाळ येथील सुभाष पाटील म्हणाले, मी गेली 40 वर्षे या बाजारात येत आहे. साखर कारखाने सुरू झाले नसल्याने ऊस तोडणी बंद आहे. त्यामुळे उसाच्या वाढ्याची कमतरता आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातून जनावरे या बाजारात येतात. शेतकऱ्यांना आपल्याबरोबर पुरेसा चारा आणणे शक्य नसल्याने जनावरांची संख्या घटली आहे.
दादा पाटणकर म्हणाले, माझे आई-वडील मृत जनावरांच्या शिंगांपासून फण्या, कंगवे, लोकोळे, तुणतुण्यांसाठी लागणारे घोडे, भोवरे, शो पीस म्हणून शिंगांचे बगळे बनवत होते. शिंगे घोळणे हा एकच व्यवसाय उरला आहे. आता इस्लामपूरच्या बाजारात जनावरे आलीच नसल्याने आम्हाला धंदा नाही. शिंगे घोळल्याने बैलांचे आरोग्य चांगले राहते.
अशोक तांबट म्हणाले, जनावरांच्या सजावटीच्या साहित्य विक्रीच्या पिढीजात व्यवसायाला घरघर लागली आहे. जनावरांच्या घटत्या संख्येने व्यवसाय मंदावला आहे. संभाजी शेवाळे म्हणाले, शेतीचे यांत्रिकीकरण झाल्याने जनावरांना काम उरलेले नाही. त्यांच्या पालनपोषणाचा खर्च वाढला आहे.
यशवंत साळुंखे म्हणाले, संकरीत गायींचे प्रमाण वाढल्याने देशी गायींचे संगोपन अत्यल्प आहे.
देशी खोंडांचे उत्पादनही घटल्याने आपोआपच बैलांची संख्या कमी झाली आहे. बैलगाड्या शर्यतींवरील बंदीमुळे लाखो रुपये खर्चून होणारी खिलार बैलांची जोपासनाही थांबली आहे. घटत्या पशुधनाचा या बाजारावर परिणाम झाला आहे. शंकरराव मोहिते म्हणाले, खर्च करुन खिलार जनावरे सांभाळणाऱ्या हौशी शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. चारा उपलब्ध नसल्याने जनावरांची उपासमार होत आहे. दरम्यान, अन्यत्र सुरू असलेले जनावरांचे बाजार संपल्यानंतर एक-दोन दिवसात इस्लामपूर बाजारात आणखी जनावरे दाखल होतील, अशी अपेक्षा बाजार समिती प्रशासनाने व्यक्त केली आहे.