नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांसह अनेक लोक त्यांचा निषेध करत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मात्र हे करत असताना त्यांनी केलेले विधान सध्या सगळ्याच्या चर्चेचे कारण बनले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी स्टॅलिन च्या वक्तव्यावर बोलताना, ‘माझा स्टॅलिनच्या मुलावर आक्षेप नाही, माझा आक्षेप हा काँग्रेसवर आहे. स्टॅलिनने जे वक्तव्यं केलं तेच चिदंबरम यांच्या मुलाने केलं. तेच वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. तेच खरगे यांच्या मुलाने केलं. सनातन धर्म नष्ट करण्याबद्दल ते बोलले, परंतु, हा उद्देश केवळ स्टॅलिन यांच्या मुलाचा नाही तर काँग्रेसचंही तेच उद्दीष्ट आहे. काँग्रेसवाले आता म्हणत आहेत की ते त्यांचं (उदयनिधी, चिदंबरम) बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मग मला काँग्रेसला विचारायचं आहे की, उद्या मी जर असं काही बोललो तर चालेल का?असा सवाल उपस्थित केला.
हिमंता बिस्वा सरमा पुढे बोलताना म्हणाले, ‘मी जर उद्या मुस्लीम धर्माबद्दल असं वक्तव्य केलं. ख्रिश्चनांविरोधात असं वक्तव्य केलं तर काँग्रेस म्हणेल का हे माझं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतात जर कोण बोललं की मी इस्लाम संपवेन, मी ख्रिश्चन धर्म संपवेन, इस्लाम धर्म कोरोनासारखा संपायला हवा असं कोण बोललं तर त्याला ते बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणतील का?’ असा सवाल काँग्रेसला केला.
त्यासोबतच आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी, माझं म्हणणं एवढंच आहे की हिंदू असो वा मुस्लीम असो, अथवा ख्रिश्चन धर्म असेल, तुम्ही तो धर्म संपवण्याची भाषा का करता? हे योग्य नाही. परंतु, या सगळ्यामागचा मुख्य सूत्रधार हा वेगळाच आहे. राहुल गांधी हे यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या इशाऱ्यानेच हे सगळं सुरू असल्याचा आरोप केला.