मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहनाने शेतकऱ्यांना चिरडल्याने परिसरात केंद्र सरकारविरोधातील द्वेष वाढला आहे. या प्रकरणानंतर आता देशभर संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपा आणि पंतप्रधान मोदींची अधिकृत ‘पॉलिसी’ आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
ते मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ”शेतकरी लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत आहेत. देशाच्या लोकशाही पद्धतीचं आपण जगाला उदाहरणं देतो आणि शेतकऱ्यांवर अशा पद्धतीनं चिरडण्याची कामं देशात केली जातात. उत्तर प्रदेशात सध्या आंदोलनांना चिरडण्याची नवी प्रथाच सुरू झाली आहे.
तर विरोधकांना अशा ठिकाणी पोहोचण्यापासून पीडितांची भेट घेण्यापासून रोखण्याचा नवा खेळ उत्तर प्रदेश सरकारने सुरू केल्याचे आपण गेल्या काही प्रकरणांपासून पाहत आलो आहोत. प्रियांका गांधींना रोखण्यात आल्याचे मला कळाले. भाजपानं काय शेतकऱ्यांना चिरडण्याची अधिकृत पॉलिसीचा स्वीकार केलाय का? हे त्यांनी सांगावं”, असे संजय राऊत म्हणाले.
“शेतकऱ्यांशी तुम्हाला पंगा घ्यायचा आहे का? तसं असेल तर खुशाल शेतकऱ्यांना विरोध करा मग बघा देशभरात काय होईल तेही पाहा. शेतकरी तुमच्या विरोधात असतील पण ते काय देशद्रोही आहेत का? त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीश सरकारी वागणूक तुम्ही देत आहात. मुंबईत बाबू गेनूने ब्रिटीशांना विरोध करताना त्यांच्या ट्रक खाली झोपून आंदोलन केले होते. त्यावेळी ब्रिटीशांनी त्याच्या अंगावरुन ट्रक चालवला होता. उत्तर प्रदेशातही अशाच पद्धतीचा प्रकार करण्यात आला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.