पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केला होता. त्यानंतर आज एकनाथ शिंदे पुण्यात चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी हजर राहिले नाही. यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. मात्र या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी अजित पवार यांनी “विरोध पक्षनेते हे महत्वाचं पद आहे. त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे,” असे वडेट्टीवारांना सुनावले. तर मूख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांबाबत ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नसल्याने आराम करण्यासाठी ते त्यांच्या मुळगावी गेले आहेत. त्यामुळे ते आजच्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा कोणीही करु नये.”
पुढे अजित पवार म्हणाले की, “अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसांनी आढावा बैठक घ्यायचो आणि गती द्यायचं काम आम्ही करतो. आत्ताही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतो आहे. देवेंद्र फडणवीस आमच्यासह आहेत, इतर सहकारीही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांच्याकडे या समितीची जबाबदारी आहे.
आम्ही सरकार मध्ये जाण्याचं कारणच हे होतं की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. हे सगळं करत असताना देशपातळीवर आम्ही मोदींना पाठिंबाही दिलेला आहे. मी या राज्याचा अर्थमंत्री म्हणून कामांचा आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असतो. मोपलवारही बैठकीला होते. पण काहींनी वेगळ्याच बातम्या चालवल्या. अरे तुम्हाला काय त्रास होतो? जर राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असतील तर काय अडचण आहे? यंत्रणा हलवली की कामं मार्गी लागतात असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मी आज आढावा घेतला तरीही मुख्य निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. लोकांची कामं झाली पाहिजेत म्हणून आम्ही लक्ष देत आहोत. तुम्ही काम रखडलं तर सांगा, आम्ही लक्ष देऊ, राज्याचा विकास होणं आवश्यक आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पणानिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाज दरम्यान पुणे मेट्रोने प्रवास केला. त्यांची ही मेट्रोवारी चांगलीच चर्चेत आली.