राजा विक्रमादित्य राजभवनातून बाहेर पडला व स्वत:वरच खूश होत शीळ घालत आपल्या राजवाड्याकडे निघाला. परंपरेनुसार वेताळाने राजाला गाठलेच व राजाचा खांदा फडक्याने पुसून त्यावर आरूढ झाला.
वैतागून राजा म्हणाला, “काय रे वेताळा, राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, आणि तू काय माझी परीक्षा घेत असतोस? मला पण काही दिवस आराम हवा’.
“राजा विक्रमादित्या, तुला रे कसला आराम आणि शतकानुशतके आपले नाते हे “केबीसी’मधील बच्चनजी व कंटेस्टंट सारखे आहे. प्रश्न तर मी विचारणारच आणि समाधानकारक उत्तरे दिली नाही तर तुझ्या कवटीची शंभर शकले करेल…’
“विचार बाबा विचार. राजवाडा येईपर्यंत माझाही टाइमपास होईल.’
“राजा, “मॉं’ आणि “मौसी’ याबद्दल या आठवड्यात कोणी भाष्य केले, पटकन सांग’.
“वेताळा, हा संघर्ष पेटला स्थलांतरित मजुरांमुळे. उत्तरेकडचे राजे यांनी स्थलांतरितांचे दु:ख कथन करताना “मुलं मॉं कडेच आशेने येणार, असे म्हटले’. त्यावर आपल्या वरिष्ठ नेत्याने “मॉं’ने सांभाळ केला नाही तर मावशी सांभाळते असे म्हणून “माय मरो पण मावशी जगो’, असे विधान केले अन् कुरघोडी केली’.
“खरं आहे राजा, यूपी या “मॉं’ने जन्म दिला, पण सांभाळ तर मराठी मावशीने केला, हो ना राजा?’
“…तर वेताळा, आणि तोही वर्षानुवर्षे. भविष्यात ही मुलं मावशीकडेच पळत येणार बघं.’
“ओके राजा, आता दुसऱ्या स्टोरीकडे वळूया. तू आता कुठून येतो आहेस?’
“राजभवनातून. का रे वेताळा?’
“नाही, अशात पूर्वाश्रमीचे मित्र व आताचे विरोधक हे रांगा लावून उभे आहेत राजभवनात राज्यपालांना भेटायला? का?’
“ते असेच रे वेताळा, गुपित आहे ते. आम्ही नाही सांगणार जा?’
“राजा, असे लाडात येऊ नकोस, तू उत्तरं देण्यास बांधील आहेस.’
“ऐक तर मग वेताळा. तू शोले चित्रपट बघितलास?’
“सात वेळा, तुझ्या खांद्यावर बसून पाहिला, विसरलास?’
“हूं… तर त्यामध्ये जय हा बसंतीच्या मौसीकडे जातो व वीरूमध्ये काय काय “गुण’ आहेत हे मौसीला सांगतो त्यामुळे वीरूचा प्रॉब्लेम होतो आणि मग मौसी कसे जय व वीरूला फटकारते हे आठवतं?’
“हो राजा, जयचा खोडसाळपणा कोण विसरेल?’
“तर वेताळा, आम्ही पण वन बाय वन आमच्या मित्राच्या कागाळ्या म्हणजेच गुणवर्णन करायला राजभवनात फेरफटका मारायला जात असतो.’
“म्हणजे? तू जय… बांद्य्रात वीरू आणि राजभवनात मौसी…? हा हा हा…!
“येस…! मौसी वीरूवर जाम चिडते, आणि सध्या आमचा हाच एकमेव उद्योग सुरू आहे. राजाचे उत्तर ऐकून वेताळ चक्रावतो आणि मॉं व मौसीबद्दल विचार करत वडाच्या झाडाला लोंबकळू लागतो.
– धनंजय एकबोटे