धनंजय एकबोटे
अखेर राजा विक्रमादित्य घराबाहेर पडला व कोकणच्या दिशेने वाटचाल करू लागला. मनात अनेक निगेटिव्ह विचार घोंघावत आहेत. राजाची मानसिक अवस्था ओळखून वेताळ राजा विक्रमाच्या खांद्यावर विराजमान झाला.
“राजा, पॉझिटिव्ह हो!”
“”वेताळा, या दिवसांत पॉझिटिव्ह होणे परवडणारे आहे का, अरे पॉझिटिव्ह म्हणजे करोना पॉझिटिव्ह हाच एकमेव अर्थ उरला आहे रे!”
“”ओहो… सॉरी सॉरी… राजा परिस्थिती गंभीर आहे याची जाणीव आहे मला, परंतु एवढा निराश का होतोस? हे संकट आर्थिक राजधानीवर जेवढे आहे तेवढेच देशाच्या राजधानीवरही आहे. ठाऊक आहे ना?”
“”होय वेताळा. पण तुला म्हणायचे आहे तरी काय?”
“”म्हणजे तू एकटा नाही, तुला सोबती आहे. आणि तसेही तुम्ही दोघं सारखेच.”
“”वेताळा, तू माझी बरोबरी करतोस राजधानी दिल्लीतल्या राजाशी!”
“”का नको करायला राजा? तुम्ही दोघेही अननुभवी, त्यात कधी नाही ते करोनाचे अभूतपूर्व संकट!”
“”खरंच रे, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे, ज्यांनी वर्षोनुवर्षे सत्ता भोगली त्यांना मलाई मिळाली आणि आम्ही खुर्चीवर बसताच करोना?”
“”तर…! यामुळे स्थलांतरित मजुरांची समस्या पण तुला आणि दिल्लीच्या राजालाच सोडवावी लागली, हो ना? म्हणजे कित्येक वर्षे जो प्रश्नच नव्हता तो तुमच्या समोर मोठी समस्या म्हणून उभा राहिला. हे पण घडले ते केवळ तुझ्या राज्यात व देशाच्या राजधानीत.”
“”वेताळा, उगाचच खपल्या काढू नकोस, तुझा टाइमपास होतो आहे; पण आमचा जीव जातो आहे जनतेची कामं करण्यात. सत्ता मिळाली की खूप आनंद असतो, थाट असतो, असे उगाचच वाटायचे रे. मात्र तसे नाही, आम्ही तर कामच करत आहोत रे वेताळा!”
“”नशिब आपले आपले. ते म्हणतात ना “रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलियुग आयेगा… हंस चुगेगा…!”
“”वेताळा, खिल्ली उडवतो आहेस, राजा विक्रमादित्याची? तुला परिणाम भोगावे लागतील वेताळा!”
“”काय खोटं बोललो राजा विक्रमा, अरे आर्थिक राजधानी व देशाची राजधानी आज आघाडीवर आहे करोनाग्रस्तांच्या बाबतीत. काही उपाय करावेत राजा, आणि मलाही सांग!”
“”वेताळा, थांब तुझी खोड मोडतोच आज” असे म्हणून राजाने म्यान केलेली तलवार उपसली.
वेताळ राजाच्या खांद्यावरून खाली उतरला व आपला मेक अप लगबगीने काढला.
“”राजा, थांब…! मी वेताळाचा वेष घेऊन आलो आहे, आपण समदुःखी. तू आर्थिक राजधानीचा राजा, मी देशाच्या राजधानीचा. आपल्यावरील संकट मोठे, आपण नंबर वन व समदुःखी आहोत. काही करावे महाराज.”
वेताळाचे खरे रूप दिसताच राजा ओशाळला व बेत बदलून अबाऊट टर्न घेत महालाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.