अरुण गोखले
शक्तिपीठ म्हणजे काय? या संदर्भात देवी भागवतामध्ये असे सांगितले आहे की, सती पार्वतीच्या अंगाचे तुकडे व तिचे अलंकार हे ज्या ज्या ठिकाणी पडले. ती स्थाने ही देवीची शक्तिपीठे म्हणून निर्माण झाली आहेत.
सती कोण? तिच्या शरीराचे तुकडे का आणि कोणी केले? या प्रश्नांच्या संदर्भात “तंत्र चूडामणी’ या नावाच्या ग्रंथात असा संदर्भ मिळतो की-
दक्ष प्रजापतीची कन्या दाक्षायणी हीच महादेवांची पत्नी सती पार्वती. तिने शिवशंकरांची पती म्हणून निवड केली. ते स्मशानवासी, कौपिनधारी, विरक्त आणि आत्मस्वरूपात रमणारे. नेमकी हीच गोष्ट दक्षाला मान्य नव्हती. त्यामुळे दक्ष शंकराकडे दुर्लक्ष करीत असे.
एकदा दक्षाने आपल्या नगरीत एका महायज्ञाचे आयोजन केले. पण दक्षाने हेतुपुरस्सर शंकर पार्वती ह्यांना या धर्मकार्यासाठी आमंत्रित केले नाही. पण शिवगणांकडून पार्वतीला या यज्ञाची कुणकूण लागली. आमंत्रण नसतानाही पार्वतीने त्या कार्याला जाण्याचा आपला मनोदय शंकरांना बोलून दाखविला. तेव्हा “आमंत्रण नसताना आपण तिथे जाणे उचित नाही,’ असे शंकरांनी तिला सांगितले. पण तिने हट्टच धरला.
दुसऱ्या दिवशी दाक्षायणी काही भूतगणांबरोबर पित्याच्या घरी यज्ञ सोहळ्यासाठी आली. मात्र माहेरी लेकीचे कुणीच आगतस्वागत केले नाही. सर्वांनी तिच्याकडे पाठ फिरविली.
महायज्ञासाठी इतर देवदेवता, ऋषीमुनी यांना आमंत्रण दिले. पण आपल्या पतीला मात्र बोलवायचे नाही. बरं आपण आलो तर आपल्याकडेही दुर्लक्ष केले. यामुळे सती पार्वतीचा क्रोध अनावर झाला. रागाच्या भरात शापवाणी उच्चारीत तिने समोरच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली.
ही वार्ता शंकराला कळताच ते तिथे आले. शिवगणांनी माता पार्वतीचा अपमान करणाऱ्या दक्षाचा यज्ञमंडप उद्ध्वस्त करून दक्षाचे शीर धडा वेगळे केले. भगवान शंकर पुढे झाले. त्यांनी यज्ञकुंडातील सती पार्वतीचे कलेवर उचलून आपल्या खांद्यावर घेतले. क्रोधायमान झालेले शंकर तांडव नृत्य करीत त्रिलोकात फिरू लागले. जोवर सतीचे कलेवर शिवाच्या खांद्यावर आहे, तोवर त्यांचा क्रोध शांत होणार नाही. हे जाणून विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. सतीच्या शरीराचे तुकडे, तिच्या अंगावरचे अलंकार हे जमिनीवर जिथे जिथे पडले, तिथे एकेक शक्तिपीठ निर्माण झाले.
आपल्या संपूर्ण भारतात अशी देवीची एकूण 51 शक्तिपीठे आहेत. यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणूका हे पूर्ण पीठ तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ मानले जाते.