नारायणगाव पोलिसांकडे पत्रकारांची निवेदनाद्वारे मागणी
नारायणगाव (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आरोपींसह तक्रारदार यांचीही योग्य ती चौकशी करावी. पत्रकारांवर बदनामी करण्याच्या दृष्टीने दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांबाबत चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा, असे निवेदन आज पत्रकारांच्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले.
यावेळी अतुल परदेशी, सुरेश वाणी, रवींद्र पाटे, सचिन कांकरिया, ऍड. कुलदीप नलावडे, अतुल कांकरिया, किशोर चौरे, प्रा. अशफाक पटेल, पवन गाडेकर, दर्शन फुलपगार, तान्हाजी तांबे, मंगेश पाटे, स्वप्निल ढवळे, चेतन बोऱ्हाडे, रफिक शेख, सुभाष घुले यांसह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहायक निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले, पोलीस प्रशासनाला पत्रकारांचे नेहमीच सहकार्य आहे.
चुकीच्या पद्घतीने किंवा कायद्याचा दुरुपयोग करून काही होणार नाही. आरोपींसह तक्रारदार यांचीही चौकशी करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. तर पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे व पत्रकारांना योग्य न्याय द्यावा, अशी भूमिका पत्रकारांनी मांडली. निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांनाही देण्यात आल्या आहेत.