पुणे – ‘करोना रुग्णांना आयसीयू बेड मिळालेच पाहिजे’ आणि “येवलेवाडी क्वारंटाइन सेंटरची सुधारणा कधी होणार’ या आणि अन्य मागण्या करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन केले. त्यांनी महापालिकेत थेट बेड आणले आणि त्यावर झोपून घोषणाबाजी केली.
महापालिकेतील मनसे गटनेते वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि अन्य कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. करोना उपचारांसाठी महापालिकेने मोठ्या हॉस्पिटल्ससोबत करार केले आहेत, असे असतानाही तेथे अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नाही.
तेथे केवळ ओळखीने आणि लक्षणे कमी असली, तरी त्यांना ऍडमिट करून घेतले जाते आणि त्याचे बिल महापालिकेच्या खात्यावर पडते. ही हॉस्पिटल्स म्हणजे लॉजिंग बोर्डिंग झाले आहेत. याबाबत यंत्रणा उभारावी, ज्या-ज्या ठिकाणी क्वारंटाइन सेंटर्स उभारले आहेत, तेथे अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव आहे तेथे लक्ष द्यावे, अशी मागणी मोरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.