संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – हिंसाचार ग्रस्त प्रदेशात स्थैर्य राखणे, संघर्ष रोखणे आणि शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी तैनात केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांची सुरक्षा आणि परिणामकारकता अबाधित राखण्यासाठी उत्तरदायी राष्ट्रांमध्ये अभिनव दृष्टिकोन आणि वर्धित सहकार्य असायला हवे असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्र शांती सेनेला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आयोजित केलेल्या विशेष चर्चासत्राला संबोधित करत होते.
शांती सैनिकांसमोर आज वेगाने उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांवर राजनाथ सिंह यांनी प्रकाश टाकला. त्यांची सुरक्षा आणि उत्पादकता यासाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि संसाधनांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याच्या गरजेवरही भर दिला.
सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणाऱ्या संस्थांनी जगाची लोकसंख्याशास्त्रीय वास्तविकता अधिक प्रतिबिंबित व्हायला हवी. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य म्हणून जागा मिळत नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भारताने दिलेल्या योगदानाचा समृद्ध वारसा आहे. या सैन्यामध्ये सर्वात मोठे योगदान देणाऱ्यांपैकी भारत एक आहे. आतापर्यंत सुमारे 2.75 लाख सैनिकांनी शांतता मोहिमांमध्ये योगदान दिले आहे. सध्या सुमारे 5,900 सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या 12 मोहिमांमध्ये तैनात आहेत, असे त्यांनी सांगितले.