हैदराबाद – देशाच्या काही भागांमध्ये अलिकडेच झालेल्या ढगफुटीमागे विदेशी हात असल्याचा संशय यावा, अशी सचिंत माहिती मिळल्याचे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. तेलंगणमधील गोदावरी नदीच्या खोऱ्यातही ढगफुटी झाली आहे.
भद्राद्री-कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलम या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पूरग्रस्त भागातील पुनर्वसनासाटी 1 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणाही त्यांनी केली. पूराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी या पॅकेज अंतर्गत रहिवासी वस्तीचे बांधकाम उंचावर करण्यात येणार आहे.
ढगफुटीमागे काही विदेशी कारस्थान असल्याचे बोलले जात आहे. काही देश आपल्या देशात ढगफुटी घडवून आणत आहेत, असे बोलले जाते आहे. यापूर्वी लेह भागात आणि उत्तराकंडमध्ये अशी ढगफुटी घडवून आणली गेली होती.
आता गोदावरीच्या खोऱ्यातही अशी ढगफुटी घडवून आणली गेली असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यामध्ये किती तथ्य आहे,हे सांगता येत नाही. काहीही असले तरी अशी नैसर्गिक आपत्ती वातावरणातील बदलामुळे घडते. त्यामुळे आपण आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करायला पाहिजे, असे राव म्हणाले.