लंडन – अपयशी कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा धनी होत असलेल्या विराट कोहलीने टीकाकारांकडे लक्ष देत नसल्याचे सांगितले आहे. मी सराव करतो, खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो. काहीवेळा यश मिळते तर काही वेळा अपयशाचाही सामना करावा लागतो. अपयशी ठरल्यावर अशा टीका होतच असतात, मात्र, त्यामुळे मी अजिबात निराश होत नाही, अशा शब्दात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या टीकाकारांचा समाचार घेतला आहे.
माझ्या खेळात कोणतीही निराशाजनक मानसिकता आलेली नाही. प्रत्येक सामन्यात मी पूर्ण सकारात्मकतेने खेळण्याचा प्रयत्नही करतो. मात्र, जर अपयश आले तर त्या सामन्याचे रेकॉर्डिंग पाहून काय चुक झाली त्याचे निरिक्षण करतो. गेल्या पाच वर्षात मी सातत्याने खेळत आहे. सतत स्पर्धा व सातत्याने होत असलेले सामने यांमुळे वर्कलोडचा विचार करावाच लागतो. प्रत्येकाला आपली कारकीर्द पूर्ण तंदुरुस्तीने व सकारात्मक मानसिकतेने खेळण्याची अपेक्षा असते. मात्र, संघाचा कर्णधार असताना मला विश्रांती मिळत नव्हती. आता आयपीएलचा मोसम संपल्यावर मी देखील काही मालिकांमधून विश्रांती घेत वर्कलोड व्यवस्थापन केले आहे, असेही कोहली म्हणाला.
टीका करणे हे टीकाकारांचे मुख्य काम आहे. माझ्या खेळात काय चुका झाल्या त्या देखील त्यांना माहिती असतात. मी फलंदाजी करताना काय करायला हवे व काय टाळायला हवे हे मला तेच सांगत असतात. अनेकांनी मला उपाय सुचवले आहेत, तेच आता विश्रांतीच्या कालावधीत करुन पाहणार आहे, अशा उपरोधिकपणे कोहलीने टीकाकारांचा समाचार घेतला आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी किंवा शतकी खेळी घडलेली नाही. 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या शतकी खेळीत त्याने आपले 70 वे आंतरराष्ट्रीय शतक साकार केले होते, त्यानंतर मात्र, त्याला अद्याप शतक फटकावता आलेले नाही. त्याला सातत्याने येत असलेल्या अपयशावर विक्रमादीत्य सुनील गावसकर, कपिल देव यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी भाष्य केले आहे. तोच धागा पकडून कोहलीने सगळ्यांवरच ताशेरे ओढले आहेत. कोहलीने आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली असून आशिया करंडक स्पर्धेद्वारे संघात परतण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधित होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आपला खेळ बहरेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.