सोलापूर :- आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह इतर संताच्या पालख्यांसोबत मोठ्या संख्येने वारकरी आहेत. अशातच या आषाढी वारीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात येणार आहेत.
त्यांच्यासोबत तेंलगणा सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील हजेरी लावणार आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून वाकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 300 गाड्यांच्या ताफ्यातून हे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
“अब की बार किसान सरकार’, असे म्हणत “बीआरएस’ पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे.
आषाढी वारीसाठी गेले अनेक वर्षापासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिगविजय सिंग येत असतात. पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री हे संपूर्ण मंत्रीमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. आषाढीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री दर्शनाला येतील.