भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्यापासून घुसखोरीपर्यंत कोणत्याही बाबतीत जेव्हा भारताकडून पाकिस्तानला पुराव्यांसह आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, त्या-त्यावेळी पाकिस्तान जगाला आपण पीडित असल्याचे भासवितो. पाकिस्तानचा आता तो कायमस्वरूपी मुखवटाच झाला असून, त्यामुळेच पाकिस्तानने जगाला काहीही सांगितले तरी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यावर सहजासहजी विश्वास ठेवत नाही.
भारतात हेरगिरीचे जाळे विणण्यापासून येथील काही सरकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना लालूच दाखवून देशाच्या सुरक्षेसंबंधी गोपनीय माहिती प्राप्त करण्याची पाकिस्तानची धडपड नवीन राहिलेली नाही. सामान्यतः ज्यावेळी अशा गोष्टी उघड होतात, तेव्हा भारत पाकिस्तानला इशारा देतो; परंतु तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहतात. याच सवयी कायम राखणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून मात्र प्रत्येक बाबतीत सवलत मिळेल अशी अपेक्षा असते.
एखादा शेजारी देश आपल्या देशातील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी वारंवार गैरमार्गांचा वापर करीत असेल आणि पकडला गेल्यावर प्रत्येक वेळी उदार दृष्टिकोनाची अपेक्षा करीत असेल, तर हा प्रकार किती वर्षे सहन करायचा? रविवारी दिल्लीच्या करोलबाग विभागात दोन संशयित पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. हेरगिरीचे जाळे विणून भारताच्या लष्कराबाबत आणि रेल्वेबाबत माहिती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्हिसा विभागात हे दोघे कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार, आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या इशाऱ्यावरून भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढून हे दोघे त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते.
सामान्य परिस्थितीत लष्कराशी संबंधित कोणतेही गोपनीय दस्तावेज मिळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या खटल्याला आणि शिक्षेला सामोरे जावे लागेल, याचा अंदाज बांधणे अवघड नाही. परंतु आंतरराष्ट्रीय करार आणि कायद्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने या दोघांना चोवीस तासांच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आणि हे दोघे निघूनही गेले. परंतु आश्चर्याची बाब अशी की, या घटनेमुळे लज्जित होण्याऐवजी पाकिस्तानने इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयातील मुत्सद्याला नोटीस बजावली आणि भारताच्या या कारवाईवर आक्षेप नोंदविला.
भारतात काम करणाऱ्या आपल्या उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना पकडून मायदेशी परत पाठविल्याने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होत आहे, याची एवढीच चिंता पाकिस्तानला असेल, तर शेजारी देशात किंवा कोणत्याही देशात अवैध पद्धतीने हेरगिरी करून त्या देशाच्या संवेदनशील दस्तावेजांपर्यंत माग काढण्याच्या कृतीला काय म्हणायचे, हेही पाकिस्तानने सांगितले पाहिजे. खुद्द पाकिस्तान आपल्या देशात बाहेरील देशाच्या नागरिकाकडून झालेल्या अशा कृतीवर कोणती प्रतिक्रिया देतो? तथापि, पाकिस्तानी अधिकारी रंगेहाथ पकडले गेलेले असतानासुद्धा त्याविषयी खेद प्रकट करण्याऐवजी उलट पाकिस्तान मग्रुरीचीच भाषा करीत आहे.
चार वर्षांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. गेल्या काही वर्षांतसुद्धा भारतीय लष्करातील काही जवानांना “हनी ट्रॅप’मध्ये अडकवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती प्राप्त करण्याचे प्रयत्नही पाकिस्तानकडून झाल्याचे उघड झाले आहे. परंतु भारताने आपल्या सक्षम गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून दरवेळी पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा पर्दाफाश केला.
भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्यापासून घुसखोरीपर्यंत कोणत्याही बाबतीत भारताने पाकिस्तानला तोंडघशी पाडले आहे. मात्र तरीही आपण निर्दोष असून भारत उगाचच त्रास देण्याच्या हेतूने पाकिस्तानचे नाव खराब करत असल्याचा उलट प्रचार पाकिस्तान करत आहे. मात्र त्यांच्या या उलट प्रतिक्रियांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. पाकिस्तानने आता स्वःपरीक्षण करण्याची गरज आहे. भारतात अशा कुरापती सातत्याने सुरूच ठेवून पाकिस्तान एखाद्या देशाकडून मैत्रीपूर्ण संबंधांची अपेक्षाच कशी ठेवू शकतो, हा खरा प्रश्न आहे.
आता भारतानेही पाकिस्तानच्या खोट्या मुखावट्याचा पर्दापाश करून जगासमोर त्याचे खरे रूप आणावे. जेणे करून पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार भारत “पाकिस्तानवर लादत असलेल्या दबावा’चे भांडे फुटेल आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडेल. पाकिस्तानने भारतावर आरोप करण्याऐवजी दहशतवादी करवाया थांबवल्या तर बरे होईल!
– अभय कुलकर्णी