सातारा -सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे, पालिकेतील तसेच सर्व्हेसाठी घेतलेल्या शिक्षणमंडळाच्या कर्मचाऱ्यांची वैदयकीय तपासणी करण्यात यावी या मागण्यांसह करोनामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, आदी मागण्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की करोनाच्या लढाईत पालिकेमधील कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. शहरातील साफसफाई, पाणीपुरवठा, विद्युत, अग्निशमन विभाग, अत्यावश्यक सेवेसह विविध सर्वेक्षणासह बाहेर गावाहून आलेले नागरिकांचे सर्वेक्षण व प्रशासनामार्फत वेळोवेळी निघणाऱ्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणीचे काम पालिका कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करताना कुटुंबाची पर्वा न करता त्यांचे कर्तव्य कर्मचारी बजावत आहेत. केंद्र सरकारने करोनाबाधित रूग्णावर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्सेस या कर्मचाऱ्यांना पुढील 3 महिन्यांकरीता 50 लाखांचे विमा संरक्षण दिले आहे व राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी 20 लाखाचे विमा संरक्षण दिले आहे. नगरपरिषद आस्थापनावरील विविध पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या कर्मचारी वर्गाच्या विमा संरक्षणाचा विचार करण्यात आलेला नाही.
नगर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत कर्मचारी समान सेवा देत असून ग्रामविकास मंत्रालयाच्या धर्तीवर नगर विकास विभागाच्या पालिका कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अत्यावश्यक दुकाने सुरू करण्याची मागणी
प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे फक्त औषध व किराणा मालाची दुकाने घरपोच सेवा देण्याची सुविधा सुरू आहे. परंतु किराणा दुकान मालकांकडून नागरिकांना योग्य सेवा पुरवली जात नाही. त्यांचा फोन घेतला जात नाही व तीच अवस्था औषध दुकानदारांचीही आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या फुड पॅकेटसची दुकानेही बंद आहेत. दुध व भाजीपाल्याची दुकांनानाही परवानगी नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. किमान काही तासांसाठी तरी किराणा माल, औषध, पाळीव प्राण्यांच्या फुडची, दूध व भाजीपाल्याची दुकाने सुरू करण्यात यावीत, अशी विनंती सातारकरांच्या वतीने करीत असल्याचे निवेदन नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.