Pune news । पती पत्नीच्या वादाचा फटका अनेकदा मुलांना बसतो. मुलांकडे दुर्लक्ष होते. त्यात मुलाचा ताबा कुणा एकाकडे असेल तेंव्हा दुसऱ्याला वेदना सहन कराव्या लागतात. अशाच एका प्रकरणात गेल्या साडेतीन वर्षांपासून नातवाचे तोंडही पाहू न शकलेल्या आणि दुर्धर आजाराने ग्र्स्त असलेल्या आजोबांची आणि नातवांची भेट होणार आहे.
ऊन्हाळी सुट्टीसाठी बारा दिवस न्यायालयाच्या आदेशाने मुले वडिलांकडे राहणार आहेत. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.व्ही. ठाकुर यांनी याबाबत आदेश दिला आहे. राजेश आणि राजश्री (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह २००८ मध्ये झाला.
दोघेही उच्चशिक्षित आहेत. आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना नऊ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा आहे. वैचारिक मतभेदामुळे दोघे मागील साडेतीन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. राजेशने घटस्फोटासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मुलांचा ताबा आईकडे आहे. सध्या त्याच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलांचा तात्पुरता ताबा देण्याच्या मागणीसाठी त्याच्या वडिलांनी ॲड. अजिंक्य साळुंके आणि ॲड. मयुर साळुंके यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. ‘वडिल आणि मुलांची ओळख राहिली पाहिजे. मुलांच्या विकासासाठी आई-वडिल दोघांचे प्रेम त्यांना मिळणे गरजेचे आहे.
दुर्धर आजाराने ग्र्स्त असलेले मुलांचे आजोबा नातवांना भेटू शकले नाहीत. ते दोघंना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे मुलाचा तात्पुरता ताबा देण्यात यावा,’ अशी मागणी पतीने या अर्जात केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुण घेऊन मुलांना वडिलांना भेटण्याचा अधिकार असल्याचा निष्कर्ष काढत आदेश केला.
मुले निष्पाप असतात. आई-वडिलांच्या वादाचा त्यांना फटका बसता काम नये. दोघांचेही प्रेम मिळणे आवश्यक असते. मुलांवर आई वडील दोघांचाही समान अधिकार असतो. हेच न्यायालयाने निकालातून दाखवून दिले आहे.
– ॲड. मयुर साळुंके आणि ॲड. अजिंक्य साळुंके, पतीचे वकील