आज बुद्धपौर्णिमा. भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित आणि प्रसाराचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. बौद्ध धम्माविषयी बाबासाहेबांच्या विचारांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा घेतलेला परामर्श…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून समाजपरिर्वतन घडवून आणता येईल का? या दृष्टीने महाडचा सत्याग्रह, पुण्यातील पर्वतीचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह असे तीन महत्त्वपूर्ण सत्याग्रह करून हिंदू समाजाची अस्पृश्यांप्रति असणारी सनातनी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले. परंतु सत्याग्रहाने अस्पृश्य बांधवांविषयीचे इच्छित ध्येय साध्य करता येत नाही, हे बाबासाहेबांच्या लक्षात आल्यानंतर ते धर्मांतराकडे वळलेले दिसून येतात.
डॉ. आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवले येथील अस्पृश्य परिषदेत केलेल्या धर्मांतर घोषणेने देशात आणि जगात खळबळ झाली आणि बाबासाहेब नेमका कोणता धर्म स्वीकारतात याकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणेनंतर हिंदू धर्माच्या अस्तित्वासाठी अस्पृश्यता निवारण्याचा थोडाफार प्रयत्न येथील हिंदू पुढाऱ्यांनी कायमचा उपचार न करता तात्पुरती मलमपट्टी केली. तसेच या दरम्यानच्या कालावधीत भारतात दोन महत्त्वपूर्ण परिषदा झाल्या होत्या. जबलपूर येथे ख्रिस्ती धर्मीयांची व कलकत्ता येथे मुसलमान धर्मीयांची तसेच अमेरिकतदेखील धर्मांतराच्या घोषणेचे वादळ पोहोचले होते. डॉ. बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्मातील मेथॅडिस्ट पंथाचा स्वीकार करावा म्हणून “इऑन्स हेरॉल्ड’ या अमेरिकेतील मेथॅडिस्ट साप्ताहिकाचा संपादक हार्टमन बाबासाहेबांना खास मुंबईत भेटण्यास आले होते.
सन 1935 ते 1956 या कालावधीत बाबासाहेबांनी हिंदू, ख्रिश्चन, जैन, इस्लाम, शीख आणि बौद्ध या धर्मांचा सांगोपांग, चिकित्सात्मक पद्धतीने 21 वर्षे सातत्याने खोलवर अभ्यास केला. अभ्यासाअंती शेवटी, त्यांना भारतीय मातीशी नाते सांगणारा बौद्ध धम्म अधिक जवळचा वाटला. बौद्ध धम्म हा धर्म नसून तो एक जीवन जगण्याचा सन्मार्ग आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी तथागत भगवान बुद्धाच्या महान धम्माचा अंगीकार केला आणि आपल्या लाखो अनुयायांनाही बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना आत्मसन्मान व स्वाभिमान प्राप्त करून दिला.
धर्मांतराच्या दोन वर्षे अगोदर बाबासाहेबांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथे 25 डिसेंबर, 1954 रोजी करण्यात आली. त्या मंगलप्रसंगी डॉ.आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शनपर भाषण केले की, “भारतामध्ये बौद्ध धम्माचे अस्तित्व सुमारे 1250 सालापर्यंत होते’. याचा ठोस पुरावा सांगताना ते पुढे म्हणतात की, “इथल्या इतिहासकारांनी खरा इतिहास लपवून नको ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपला महाराष्ट्र देशसुद्धा शंभर टक्के बौद्धधम्मीय होता व त्याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्रातील पुरातनकाळच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील. भारतातील 2 हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत. हेच त्यांच्या निवाऱ्याचे स्थान होते.
15 हजार विहारांमधून सुमारे 35 हजार भिक्खू राहत असत. जनतेकडून बौद्ध धम्माप्रमाणे भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत असत. 1250 वर्षे ते या प्रांतामध्ये, तसेच या देशात नालंदा येथील विश्वविद्यालयात होते. ज्ञानप्राप्ती करून देणे हे या धम्माचे तत्त्व होते. पहिले विश्वविद्यालय बौद्धधम्मीय लोकांनी स्थापन केले. नालंदा विश्वविद्यालयात 13 हजार विद्यार्थी आणि 1 हजार अध्यापक होते. नालंदा आणि तक्षशिला येथील विश्वविद्यालयात पूर्वी भिक्खूंचाच भरणा असे. अर्थात त्या काळचे भिक्खू विद्वान असून त्यांना धम्मप्रसारासाठी समाजसेवा पत्करणे पसंत होते. फ्रेंच राज्यक्रांतीने समता प्रस्थापनेचे जे कार्य केले तेच क्रांतिकार्य बौद्ध धम्माच्या उदयामुळे घडले आहे. प्रजासत्ताक राज्यपद्धत आणि विद्यापीठीय संकल्पना ही जगात सर्वप्रथम बौद्धांनीच रूजवली आहे. ही बौद्धकाळाची फार मोठी देणगी आहे. तसेच बौद्धकाळातच साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली की अनेक देशांतील विद्यार्थी नालंदा व तक्षशिला येथील विश्वविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेले होते, असे बौद्धकालीन इतिहासावरून दिसून येते.
तथागत गौतम बुद्धांनी प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोनशिलांपैकी एका कोनशिलेइतके महत्त्व दिले आहे. बुद्धांच्या धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी आधुनिक युगाला जुळणारी आहे. प्रज्ञा आणि करूणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच तथागत बुद्धांचा धम्म होय. इ. स. 212 शतकापूर्वी कलिंगच्या युद्धातील भयानक हत्याकांड पाहून उद्विग्न झालेल्या सम्राट अशोकाने विजयादशमीला बौद्ध धम्म स्वीकारला होता. राजा अशोकाला शांती हवी होती, तर डॉ. बाबासाहेबांना समता हवी होती. शांती आणि समता म्हणजेच बुद्धांचा धम्म होय. बाबासाहेबांनी धर्म (उपासना पंथ) आणि धम्म (जीवनपद्धती) यातील फरक “धर्म हा व्यक्तिगत असतो पण धम्म हा सामाजिक आहे’ या शब्दांत स्पष्ट केला आहे. तथागत गौतम बुद्धांच्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा निर्मळ धम्म बाबासाहेबांनी अस्पृश्य बांधवांना देऊन त्यांना विकासाच्या मार्गावर आणले.
भगवान बुद्धांचा पवित्र धम्म भारतात उगम पावला आणि त्यांनी प्रकाशित केलेल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार आशिया खंडात सर्वत्र पसरला. इतकेच नव्हे तर विसाव्या शतकामध्ये चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, व्हिएतनाम, इत्यादी राष्ट्रांतील लाखो लोक बौद्ध धम्माचा स्वीकार करीत आहेत. याचे कारण, बुद्ध धम्म हा शास्त्रशुद्ध, बुद्धीला पटणारा व समाजात शांती आणि समता यांची वृद्धी करणारा असा धम्म आहे. सध्याच्या जगातील विज्ञानयुगाशी, शास्त्रीय विचारांशी सुसंगत बुद्धिप्रामाण्यवादी असा हा धम्म आहे. या धम्माच्या अभ्यासाने भावना शुद्ध होतात. पूर्वदुराग्रह नाहीसे होतात, प्रज्ञा आणि करूणा यांची वृद्धी होते. आजच्या समाजात स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुत्व यांची जोपासना करून लोकशाहीचा विकास करण्यासाठी व जगातील संभाव्य युद्धे टाळण्यासाठी बुद्ध धम्माचा अभ्यास व आचरण करणे गरजेचे आहे. शिवाय, बौद्ध धम्माप्रमाणे वर्तन करणेही तितकेच आवश्यक आहे. आपले सध्याचे जग फारच गुंतागुंतीचे आहे. या जगातील मानवी प्रश्न केवळ विज्ञानाने सुटणार नाहीत, तर ते बुद्धाने उपदेशिल्याप्रमाणे नीतिमान आणि चारित्र्यसंपन्न जीवन जगल्याने सुटू शकतील. भगवान बुद्धांचा धम्म हा मानवाला समृद्धीकडे घेऊन जाणारा धम्म आहे.
हा धम्म सत्य, अहिंसा, करूणा आणि मानवता शिकवितो. तसेच राग, द्वेष, लोभ, मत्सर, वैर सोडून माणसा-माणसाला जोडण्याचा सन्मार्ग दाखवितो. म्हणूनच, डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारून कोट्यवधी दलित बांधवांना विकासाच्या पाऊलवाटेवर आणून ठेवले.
– डॉ. विलास आढाव