मालाची वाहतूक व वितरण व्यवस्था न रोखण्याची सूचना
नवी दिल्ली – देशभर पुकारण्यात आलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन मुदतीत सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना तशी सूचना जारी केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची वाहतूक रोखली जाऊ नये, असेही सर्व संबंधितांना सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या सुचनेचा काटेकोरपणे अंमल करायचा असला तरी जीवनावश्यक वस्तूंची प्रक्रिया, साठे, त्या वाहून नेणे, त्यांचे पॅकेजिंग करणे, वितरण करणे आणि त्यांच्या विक्रीची व्यवस्था करणे या प्रक्रियेत अडथळा येणार नाही याचीही काळजी घेण्यास गृहमंत्रालयाने सांगितले आहे. अशा सर्व सेवांना प्रतिबंधात्मक उपायांतून वगळण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा व सेवांचा पुरवठा करणाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे.
या संबंधात जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी नोडल ऑफिसरही नेमण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी आंतरराज्य वाहतूक करावी लागली तरी त्यांना तशी अनुमती दिली जावी आणि त्या अनुषंगाने त्यांना संरक्षणही दिले जावे, असे राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे.