नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या सेवेत लाखो कंत्राटी कर्मचारी काम करत असून 31 मार्चपर्यंत रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे या सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रेल्वेने या सर्वांना मोठा दिलासा देत बंद काळातील त्यांचे संपूर्ण वेतन देण्यात येईल, असे मंगळवारी जाहीर केले.
यासंदर्भात रेल्वेने आदेश जारी केले असून यामध्ये वरील घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेकडे गाड्यांमधील हाऊसकिपिंग सेवा, स्वच्छतासेवा, खानपान विभाग तसेच अन्य व्यावसायिक सेवा यांच्यासाठी मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी आहेत. या सर्वांना 31 मार्चपर्यंत सक्तीने घरी बसावे लागत आहे.
अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना केव्हाही सेवेसाठी बोलावले जाणार आहे, परंतु सध्या ते घरी आहेत. या सर्वांना रोजगार गेल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होऊ नयेत, यासाठी रेल्वे बोर्डाने हंगामी, कंत्राटी, आऊटसोर्स केलेले अशा सर्व कर्माचाऱ्यांना मार्चपर्यंतचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना 100 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.