मुंबई: कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासन स्तरावर उपाययोजनांच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच आज नामांकीत कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाल्याचे टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले, या बैठकीत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत खाजगी कंपन्यांनी काही निधी मदत स्वरूपात द्यावा आणि शक्य असल्यास कार्यालये बंद ठेवावीत, असे आवाहन कंपन्यांच्या प्रतिनिधींना केले.
कोरोनाचा सामना करण्यासाठी आज सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत नामांकीत उद्योजकांच्या एक विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला १८ खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कंपन्यांनी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
यावेळी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी सूचना राजेश टोपे यांनी केली. तसेच या बैठकीत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत मदतरूपाने निधी मिळवला जाणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.