मंचर येथे सायबर सुरक्षा दिंडी आणि मार्गदर्शन शिबिर
मंचर – आपली वैयक्तिक माहिती असो वा कोणत्याही कंपनीची अथवामहत्त्वाच्या संस्थांबद्दलची माहिती असो ती डिलीट केली तरी त्याची इतर ठिकाणी साठवणूक केली जाते आणि हा महत्त्वाचा डाटा नंतर विकला जातो, त्यामुळे आपण आपली माहिती गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. माहिती व तंत्रज्ञान कायदा जरी अस्तित्वात असला तरी तो प्रभावी नाही. प्रभावी कायदा आला पाहिजे, जेणेकरून सायबर गुन्ह्यात सापडलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनू सांगितल.
मंचर (ता. आंबेगाव) येथे पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केलेल्या सायबर सुरक्षा दिंडी आणि सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी युवानेत्या पूर्वा वळसे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब गार्डी, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांसह पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा वापर बेकायदेशीर विनाशाकडे जाणारा नसावा तर तो विकासाकडे जाणारा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला आदर्श असताना नवीन पिढी मात्र गुन्हेगारीकडे वळत आहे. यावेळी पूर्वा पाटील म्हणाल्या, सध्या सर्वच वर्गातील व्यक्तींनी मोबाइल टेक्नॉलॉजीमधील धोके व तोटे समजावून घेणे गरजेचे आहे. यावेळी पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.