नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतात घुसखोरी करणे हा काही पोरखेळ नसल्याची जाणीव संपूर्ण जगाला झाली. भारतात शिरकाव करण्याची शिक्षा मिळेल, अशी परखड भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मांडली.
भारत आणि चीनमध्ये सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर, शहा यांनी ओडिशातील जनतेला व्हर्चुअल सभेद्वारे संबोधित करताना केलेल्या वक्तव्याचे महत्व वाढले आहे. अर्थात, शहा यांनी कुठल्या देशाचा नामोल्लेख टाळला. भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा आणि हवाई हल्ल्याचा संदर्भ त्यांनी दिला.
केवळ अमेरिका आणि इस्त्रायल या देशांमध्येच आपल्या सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची क्षमता असल्याचे काही जण म्हणायचे. त्या देशांच्या यादीत मोदींनी भारताचाही समावेश केला, असे शहा म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात घरवापसी करण्यासाठी धडपडणाऱ्या स्थलांतरित मजुरांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. त्यावरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांवर शहा यांनी जोरदार पलटवार केला. स्थलांतरितांच्या हिताला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. आमच्याकडून काही चुका झाल्याही असतील. पण, आम्ही स्थलांतरिताच्या भल्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यांच्यासाठी विरोधकांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला.