बाधित दुपटीचा वेग 12 दिवसांवर
पुणे – शहरात करोनावर मात करून बरे होणाऱ्यांचा आकडा वाढत असतानाच पुणेकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 8 वरून 12 दिवसांवर आला आहे.
दोन आठवड्यांपूर्वीच केंद्र शासनाने पुण्यातील रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आठ दिवसांचा असून, तो देशात सर्वाधिक असल्याची चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, करोनाला अटकाव घालण्यासाठी संक्रमित क्षेत्रात कडक उपाय योजना आणि चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यानंतर रुग्णांचा आकडा वाढत असला, तरी तो दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. शहरात करोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा आकडा दुप्पट झाला. तर त्यानंतर हे आकडे दुप्पट होण्यास पाच दिवसांचा कालावधी लागला. यावेळी केवळ 8 रुग्ण होते. तर त्यानंतर 16 रुग्ण होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागला.
तर 16 चे 32 रुग्ण होण्यास केवळ 4 दिवस लागले, तर 32 चे 64 रुग्ण पाच दिवसांत झाले. त्यामुळे सुरुवातीला एका महिन्यात ही सर्व स्थिती होती. तर, 174 चे 268 रुग्ण पुन्हा पाच दिवसांत झाले. त्यामुळे हा रुग्ण दुप्पट होण्याचा वेळ शहरात अवघा 5 दिवसांचा होता. यावर गांभीर्याने लक्ष देत पालिकेने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या. पण, रुग्णसंख्या वाढतच होती. शहरात 24 एप्रिल रोजी रुग्णांचा आकडा 1,122 वर गेला होता. त्यानंतर आता ही संख्या दुप्पट होण्यास 11 दिवस लागले असून, 5 मे रोजी हा आकडा 2 हजार 40 वर गेला आहे. एका बाजूला बाधितांची संख्या वाढत असताना बाधित दुप्पट होण्याचा वेग मंदावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
केंद्राच्या चिंतेनंतर
पुण्यातील रुग्णवाढीच्या वेगाबद्दल केंद्रीय आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केल्यानंतर पालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी सर्वेक्षण, मोबाइल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी, फ्लू सेंटर सुरू केले आहेत. तर ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत, तो भाग अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करून त्या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नवे रुग्ण वाढत असले, तरी दुप्पट होण्याचा वेग कमी झाल्याचे पालिकेने म्हटले आहे.
महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजना योग्य पद्धतीने राबवल्या जात असल्याने करोनाबाधितांचा वेग मंदावलेला आहे. हा दुपटीचा वेग 14 दिवसांवर नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडून रुग्णसंख्या नियंत्रित करणे शक्य होणार आहे. आता हेच उद्दिष्ट घेऊन काम सुरू आहे.
– शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त