गयाना :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताना गमावल्यावर माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने परखड भाष्य केले आहे. संघ व्यवस्थापन व कर्णधार हे संघात करत असलेले प्रयोग चुकत आहेत, अशा शब्दात चोप्रा यांनी ताशेरे ओढले आहेत.
विश्वकरंडक स्पर्धेच्या तसेच त्यापूर्वी होत असलेल्या आशिया करंडक स्पर्धेच्या आराखड्यासाठी तसेच नियोजनाचा भाग म्हणून संघात काही प्रयोग केले तर ते मान्य होतात मात्र, टी-20 मालिकेत जे काही प्रयोग भारतीय संघात होताना दिसत आहेत त्याचे नवल वाटते. भारताकडे दर्जेदार सेकंड बेंच आहे यात शंका नाही मात्र, केवळ रोटेशननूसार त्यांना विविध क्रमांकावर खेळवणे धोकादायक ठरु शकते. भारतीय संघ व्यवस्थापन व टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याच सध्या गोंधळून गेल्यासारखे चित्र दिसत आहे. अंतिम संघात कोणाला स्थान द्यायचे किंवा कोणाला बाहेर ठेवायचे या मागे कीहीतरी विचार असला पाहीजे जो सध्या अजिबात दिसत नाही, असे चोप्रा म्हणाले.
संघात हे जे काही प्रयोग केले जात आहेत ते का केले जातात याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि हाच मोठा प्रश्न आहे. सध्या सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन्ही सामन्यात भारताला सलामी चांगली मिळाली नाही तसेच मधल्या फळीतील फलंदाज साफ अपयशी ठरले. खरेतर या युवा खेळाडूंना ही मालिका म्हणजे आपली कर्तबगारी दाखवून देण्याची नामी संधी होती. ती त्यांनी गमावली. प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यामागे हाच तर हेतू होता की जास्तीत जास्त संधी नवोदितांना मिळावी व युवा खेळाडूंना सामने खेळण्याचा अनुभव मिळावा. तसेच तणावाची परिस्थिती कशी हाताळावी याचे धडे मिळावेत; परंतु पहिले दोन सामने पाहून युवा खेळाडू काय शिकले असतील हे मला तरी समजलेले नाही, असेही चोप्रा यांनी म्हटले आहे.
मध्यंतरी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सेकंड बेंचला संधी मिळेल व रोटेशननुसार त्यांना खेळवले जाइल असे म्हटले होते, मात्र, केवळ एक किंवा फारतर दोन खेळाडूंमध्ये बदल केला जात आहे व बाकीच्यांना बेंचवरच बसवले जात आहे. भारतीय फलंदाजी भक्कम मानली जाते मात्र, या मालिकेत ना सलामी सरस मिळत आहे ना मधल्या फळीतील फलंदाज धावा करत आहेत. त्यांनी मोठी धावसंख्या उभारून दिली तरच गोलंदाजांच्या पाठीशी धावांचे पाठबळ लाभते व ते हिंमतीने गोलंदाजी करु शकतात. मात्र, दीडशतकी धावा वाचवण्यासाठी एक किंवा दोनच गोलंदाजांवर अवलंबून राहता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
वेळ व पर्याय तपासले जावेत…
ही मालिका पार पडल्यावर भारतीय संघाला दोन मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. आशिया करंडक तसेच एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच प्रयोग केले गेले पाहिजेत. सध्या जे काही सुरू आहे त्याला प्रयोग म्हणावे की हतबलता असा प्रश्न निर्माण होतो. हे प्रयोग करण्यासाठी आपल्याकडे या मोठ्या स्पर्धांसाठी तयारी करताना वेळ किती शिल्लक आहे व आपल्याकडे खेळाडूंसाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासून घेतले पाहिजे तरच ही कोंडी फुटेल, असेही चोप्रा म्हणाले.