लखनौ – वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखलेला भारतीय संघ आजपासून श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. विजयी सातत्य कायम राखण्याचे आव्हान या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर राहणार आहे.
भारत वि. श्रीलंका (पहिला टी-20 सामना)
वेळ : संध्याकाळी 7
ठिकाण : लखनौ
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस
या मालिकेसाठी करण्यात आलेल्या संघ निवडीकडे पाहिले तर भारतीय संघच वरचढ वाटतो. मात्र, श्रीलंका संघाकडे समोरच्या संघाला आश्चर्याचा धक्का देण्याची क्षमताही आहे हे विसरून चालणार नाही. मात्र, श्रीलंका संघाला नुकत्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा दारूण पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांची मानसिकताही खालावलेली आहे. याचा लाभ भारतीय संघाला होणार यात शंका नाही. अखेरचा टी-20 सामना जिंकत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियात प्रतिष्ठा राखली असली तरीही सध्याच्या भारतीय संघावर वर्चस्व राखणे त्यांच्या क्षमतेपेक्षा मोठे असल्याचेच दिसत आहे.
– प्रमुख खेळाडूंची श्रीलंकेला उणीव
– अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, रमेश मेंडीस व नुवान तुषारा दुखापतग्रस्त
– भारताचा सूर्यकुमार दुखापतीमुळे बाहेर
– ऋतुराजला खेळवण्यासाठी दडपण
– शार्दुल ठाकूरलाही विश्रांती
– रवींद्र जडेजाचे पुनरागमन
– जसप्रीत बुमराहही परतला
– बुमराहकडे उपकर्णधारपद
– राहुल व सुंदर दुखापतीमुळे बाहेर
– संजू सॅमसनलाही संधी
– ऋषभ पंतलाही विश्रांती
संघाचे बलाबल पाहता भारतीय संघाकडे फलंदाजी व गोलंदाजीत दीग्गज खेळाडू असून नवोदितांनीही आपल्यावरची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा संघात परतल्यामुळे तसेच व्यंकटेश अय्यरने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केल्यामुळे श्रीलंका संघासमोर मोठे आव्हान राहणार यात शंका नाही. व्यंकटेशच्या जोडीला श्रेयस अय्यर, दीपक हुडा, इशान किशन व खुद्द कर्णधार रोहित शर्मा अशी भक्कम फलंदाजी आहे.
महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड व प्रियांक पांचाळला संधी मिळाल्याने ते कशी कामगिरी करतात याकडेही लक्ष लागले आहे. माजी कर्णधार विराट कोहली, दुखापतीने जायबंदी झालेला दीपक चहर यांच्या अनुपस्थितीचा फटका भारतीय संघाला बसू शकतो. मात्र, गोलंदाजीत भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, महंमद सिराज यांच्या जोडीला यजुवेंद्र चहल, रवी बिष्णोई यांच्या जोडीला व्यंकटेश अय्यर व जडेजा यांचीही फिरकी गोलंदाजी असल्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करणे शक्य होणार नाही असेच चित्र दिसत आहे. श्रीलंकेकडेही कर्णधार दासून शनाका, कुशल मेंडीस, पाथुम निसांका, धनुष्का गुणतिलका व दिनेश चंडीमल अशी चांगल्या फलंदाजीची फळी आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज त्यांच्यावर वर्चस्व राखणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
करोनाच्या बाधेमुळे हसरंगा विलगीकरणात
श्रीलंका संघाकडे वनिंदू हसरंगा हा ट्रम्पकार्ड ठरेल असा गोलंदाज आहे. मात्र, या मालिकेत आता त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याची करोना चाचणी करण्यात आली होती व त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याला आता विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याला आता टी-20 मालिकेत खेळता येणार नसून कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध असेल.
रवींद्र जडेजा निर्णायक ठरेल
भारतीय संघाचा अष्टपैलु रवींद्र जडेजा याने तब्बल दोन महिन्यांनंतर संघात पुनरागमन केले आहे. त्याला दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नव्हते. तसेच त्यानंतर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी खूप काळ व्यतीत करावा लागला. त्यामुळे फारसा सराव मिळालेला नसतानाही त्याची डावखूरी फिरकी श्रीलंकेसाठी त्रासदायक ठरी शकते.