India vs Australia T20 Series : सूर्यकुमार यादव याच्याकडे भारताच्या टी-20 क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही चाहत्यांनी तर बीसीसीआय व निवड समिती यांच्यावर प्रचंड टीकाही केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात येत्या गुरुवारपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका भारतीय संघ खेळणार असून प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना नवोदितांचा भरणा असलेला संघ बीसीसीआयने जाहीर केला.
अष्टपैलू हार्दिक पंड्या अद्याप दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेला नसल्याने सूर्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. भारतात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रत्येक सामन्यात संधी देण्यात आल्यावरही सूर्याला एकही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. तसेच अंतिम सामन्यात सुवर्णसंधी असतानाही त्याने अत्यंत बेजबाबदार पद्धतीने आपली विकेट गमावली होती. तरीही त्याला संघातून बाहेर बसवण्याऐवजी थेट टी-20 संघाचे नेतृत्व कोणत्या निकषावर दिले असा सवालही चाहत्यांनी केला आहे.
संघात महाराष्ट्राचा ऋतूराज गायकवाड आहे तसेच त्याने गेल्या महिन्यात चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटमध्ये भारताला सुवर्णपदकही जिंकून दिले होते. मात्र, तरीही नेतृत्वासाठी त्याच्या नावाचा विचार का करण्यात आला नाही, अशी विचारणाही करण्यात आली आहे.
सॅमसनवर सतत अन्याय का…?
भारताचा टी-20 संघ निवडताना निवड समितीने संजू सॅमसनला का संधी दिली नाही. गेल्या तीन ते चार मोसमांपासून सातत्याने त्याला डावलले जात आहे. निवड समितीतही प्रांतवाद सुरू झाला आहे का, असा सवालही अनेकांनी केला आहे.
भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्सर पटेल, शिवम दुबे, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
सूर्यकुमारसाठी ही अखेरची संधी…
भारतीय संघाचे नेतृत्व जरी सोपवले गेले असले तरीही ही मालिका सूर्यकुमारसाठी अखेरची संधी असल्याचे संकेतही बीसीसीआयकडून मिळत आहेत. आयपीएल स्पर्धा सातत्याने गाजवणारा का खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय सामन्यांमध्ये आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. संपूर्ण विश्वकरंडक स्पर्धेत त्याच्याकडून एकही मोठी खेळी झालेली नाही. अनेक नवोदित सध्या सेकंड बेंचवर बसून आहेत. या मालिकेतही जर सूर्यकुमार अपयशी ठरला तर यापुढील काळात भारतीय संघातील स्थान त्याला टिकवता येणार नाही, असेही बोलले जात आहे.