मुंबई :- एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी प्रमुख खेळाडूंना का विश्रांती दिली गेली, याचा खुलासा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केला आहे.
आशिया करंडक स्पर्धेत नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व हार्दिक पंड्याने सरस कामगिरी केली आहे. मात्र, या स्पर्धेसाठी तसेच यंदाच्या मोसमात सातत्याने झालेल्या सामन्यांसाठी तसेच त्यासाठी कराव्या लागलेल्या प्रवासामुळे या खेळाडूंना विश्रांतीची गरज होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी हे सर्व प्रमुख खेळाडू संघात परततील. आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी हे खेळाडू ताजेतवाने राहावेत असाच आमचा हेतू होता,असा खुलासा आगरकर यांनी केला आहे.
दरम्यान,एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी उद्यापासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या (शुक्रवार) होणार असून बदली कर्णधार लोकेश राहुल याच्या नेतृत्वक्षमतेचा कस या सामन्यात लागणार आहे.