जालना – तुरीच्या शेतात एक एकर गांजाची लागवड ( ganja plants) करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या कल्याणी गावच्या शिवारामध्ये घडला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची गांजाची झाडं जप्त केली आहेत. यानंतर पोलिसांनी मजुरांकडून ही गांजाची झाडे ट्रॅक्टरमध्ये भरली.
दरम्यान, पोलिसांना भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावच्या शिवारामध्ये गाजांची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून एका एकरात लावलेल्या गांजाची झाडं जप्त केली आहेत.
या कारवाईमध्ये 10 ते 12 फूट वाढलेली 500 ते 600 झाडे जप्त करण्यात आली आहेत. ही गांजाची झाडे ट्रॅक्टरमध्ये टाकून पोलीस या मुद्देमालाचा हिशोब लावत आहेत. पोलिसांच्या अंदाजनुसार हा कोट्यवधींचा मुद्देमाल आहे. दरम्या, याप्रकरणी शेती मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भारतात गांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात. काहीजण व्यापार देखील करतात. त्याचे सेवन करतात. अशाप्रकारे, आपल्या देशात हजारो वर्षांपासून गांज्याचं सेवन केलं जातं. वर्ष 1985 पर्यंत गांजावर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती, पण राजीव गांधी यांच्या सरकारने 1985 मध्ये एनडीपीएस कायदा आणला.
या कायद्यानुसार गांजावर बंदी घातली गेली. गांजाबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. एकीकडे गांजाचे तोटे सांगणारे लोक आहेत तर त्याचे फायदे सांगणाऱ्यांचीही संख्या बऱ्यापैकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात गांजावरील बंदी हटविण्याची मागणी होत आहे.