#INDvAUS 1st ODI :- भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या तिकीट विक्रीला अत्यंत थंड प्रतिसाद मिळत आहे. आशिया करंडक स्पर्धेत श्रीलंकेत जसे चित्र दिसले तसेच चित्र या मालिकेतील मोहालीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या वेळी दिसले.
अनेक प्रेक्षक गॅलरी रिकाम्याच दिसत होत्या. या सामन्यासाठी जर पंजाब क्रिकेट संघटनेने चाहत्यांना मैदानाकडे वळवण्यासाठी चक्क एका तिकिटावर एक तिकीट मोफत ही योजनाही राबवली होती, मात्र तरीही संपूर्ण सामन्यात मैदानावरील प्रेक्षक क्षमतेच्या केवळ 35 टक्केच तिकिटे विकली गेली होती.
भारतीय संघ देशात तसेच परदेशात सातत्याने खेळत आहे. अतिक्रिकेटमुळेच प्रेक्षक आता सामन्यांकडे पाठ फिरवू लागले आहेत, तसेच सध्या देशभरात गणेशोत्सव असल्यामुळेही तिकीट विक्रीवर परिणाम झाल्याचे पंजाब क्रिकेट संघटनेच्या सूत्रांनी व्यक्त केले आहे.