छत्रपती संभाजीनगर – “मी जबाबदारीने सांगत आहे, जेव्हा राष्ट्रवादीत (Ncp) बंडखोरी झाली त्यावेळी यावर्षी 50 कोटी पुढच्या वर्षी 50 कोटी असे अभिवचन देण्यात आल्याचे फोन अजित पवार (Ajit Pawar)यांच्या बंगल्यावरून आले आहेत,’ असा दावा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
दानवे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर अजित पवारांवर टीका करत आहेत, अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका कुणीही करू नये. व्यक्तिगत टीका करणे चुकीचे आहे. परंतु, एका आमदारामुळे राज्याच्या अध्यक्षाला माफी मागावी लागते हे भाजपचे (bjp) दुर्दैव असल्याचे म्हणत भाजपाला दानवे यांनी टोला लगावला आहे. तसेच, राष्ट्रवादीमधील बंडाळीवेळी आमच्यातील काही लोकांनीदेखील फोन आले होते.
ठाकरे सरकारच्या काळात अजित पवार निधी देत नाहीत म्हणून काही लोक बोंब ठोकत होते, आता तेच तेच पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. (Ambadas danave)
दानवे पुढे बोलताना म्हणाले की, शाळांचा खासगीकरणाचा घाट हा मुठभर शिक्षण सम्राटांची तुंबडी भरण्यासाठी सरकारच्या मदतीने केला जातोय. या खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणे चुकीचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मराठा समाजाची मागणी आहे. परंतु, 50 टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे भाजपाने संसदेत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. तरीही मराठा समाजाला भाजपा आरक्षण देत नाही. मराठा आरक्षणावरून त्यांची दुटप्पी भूमिका आहे.