आळंदी -संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा रविवारी (दि. 11) 4 वाजता होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तसेच सोहळ्यासोबत पायी पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. घाट परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे. वैष्णवांचा मेळा आळंदीत दाखल झाला आहे. वारकऱ्यांना आता प्रस्थान सोहळ्याची आणि विठ्ठल भेटीची आस लागली आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले वारकऱ्यांची दिवसभर लगबग दिसून येत होती. भाविक वारकरी हे आळंदीतील विविध धार्मिक ठिकाणाना भेटी देत होते. वडगाव चौकातील माऊलींनी चालवलेली भिंत, माऊलींचे राहते घर असलेले ठिकाण सिद्धबेट, योगी चांगदेव आणि माऊलींचे भेटीचे ठिकाण विश्रांतीवड, संतोषीमाता मंदिर, पद्मावती मंदिर, आदी ठिकाणांना वारकरी भेट देत होते.
“सिंबायोसिस’तर्फे फिरता वारकरी दवाखाना
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. “सिंबायोसिस’च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, महापालिका अतिरिक्त 1आयुक्त कुणाल खेमनार, “सिंबायोसिस’च्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, ट्रस्टचे संस्थापक ऍड. अविनाश साळवे, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, पालिका आरोग्यप्रमुख भगवान पवार, शांतीलाल भटेवरा, ऍड. प्रतापसिंह परदेशी, अक्षय साळवे, निवेदिता एकबोटे, राधिका धिंग्रा आदी उपस्थित होते.
यंदा 10 सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व 300 हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम यामध्ये काम करते. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवेसाठी ही सज्ज असते, असे ऍड. अविनाश साळवे यांनी सांगितले.