पुणे – निवडणुका रखडल्याने महापालिका प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार हेच कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आयुक्तच पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महापालिका आयुक्तास ही संधी मिळालेली आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी असताना पालख्यांच्या स्वागताचा मान महापौरांना असतो. मात्र, 15 मार्च 2021 पासून महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती असल्याने आयुक्त कुमार यांना ही संधी मिळलेली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम पालख्यांचे सोमवारी आगमन होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आळंदी रस्त्यावरील स्व. सयाजीराव कुसमाडे संकुल (करसंकलन कार्यालय), कळस क्षेत्रिय कार्यालय, आळंदी रस्ता येथे सकाळी साडेअकरा वाजता आगमन झाल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार पालखींचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत.
तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी सिग्नल चौक येथे दुपारी 1 वाजता आगमन झाल्यानंतर विक्रम कुमार पालखीचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. दुपारी 4 वाजता “नाबार्ड’समोर पाटील इस्टेट वसाहतीशेजारी येथे दोन्हीही पालख्यांचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. त्यानंतर बुधवारी सकाळी 9 वाजता हडपसर गाडीतळ जवळ, हडपसर येथून दोन्हीही पालख्यांचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थानावेळी आयुक्त हेच निरोप देणार आहेत. यावेळी सर्व अधिकारी, खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
पालखी मार्गावर आरोग्य शिबीर
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या “जिज्ञासा’ उपक्रमांतर्गत आषाढी वारीनिमित्त विविध मार्गावचर आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यात
आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथीचे शिक्षण घेणारे आणि “अभाविप’तून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत ही आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. यात एकूण डॉक्टर्स व विद्यार्थ्यांची संख्या 700 हून अधिक सहभागी असतील. मागील वर्षीच्या वारीत तब्बल 60 हजार वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यात आली होती. तर, यंदा वारी मार्गावर स्वच्छता, व्यवसाधीनता, अवयवदान यासाठी समाजात जागृती व्हावी, यासाठी पथनाट्येही सादर केली जाणार असल्याची माहिती “अभाविप’चे प्रदेशमंत्री ऍड. अनिल ठोंबरे यांनी दिली. यावेळी श्रीपाल राजपुरोहित, कौस्तुभ पिले उपस्थित होते.