– डॉ. नेहा सिन्हा
भारताने मॉरिशसबरोबर केलेला खुल्या व्यापाराचा करार अनेक पातळ्यांवर भारतासाठी उपयुक्त ठरणार आहे. खुल्या व्यापारामुळे दोन्ही देशांमधील संबंध नवी उंची गाठतील, अशी
अपेक्षा आहे.
हिंदी महासागरात भारताच्या नैऋत्येस असलेला मॉरिशस हा छोटासा देश “लिटल इंडिया’ नावाने ओळखला जातो. सर्वच बाबतीत भारताशी खूप निकटता सांगणारा हा देश. स्वतंत्र बेट असलेल्या या देशाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सागर’ (सुरक्षितता आणि क्षेत्रातील सर्व देशांचा विकास) योजनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेच; शिवाय हिंदी महासागराच्या क्षेत्रात भारताचा सर्वांत महत्त्वाचा शेजारी म्हणूनही मॉरिशस महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक संपन्नता, नियमित उच्चस्तरीय राजनैतिक संपर्क, विकासातील सहकार्य, संरक्षण आणि सागरी क्षेत्रातील सहकार्य अशा सर्व बाबतीत भारत आणि मॉरिशस यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यातून मॉरिशसचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरला. भारताशी मुक्त व्यापाराच्या करारावर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा आफ्रिकी क्षेत्रातील पहिला देश ठरला आहे. व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारीबरोबरच आफ्रिका खंडात व्यापार, वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात नवनवीन संधी प्रदान करून व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ देणारा हा करार आहे. मॉरिशसचे भौगोलिक स्थानच त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
मॉरिशस हे आफ्रिकेच्या प्रवेशद्वारासारखेच आहे. भारतीय व्यावसायिक या करारामुळे मॉरिशसमध्ये आणि संपूर्ण आफ्रिका खंडात गुंतवणूक करू शकतील. परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा हिंदी महासागरातील भारतासाठी व्यूहात्मक दृष्टीनेही सफल ठरला आहे. कारण सध्या हिंदी महासागराच्या क्षेत्रात भारत भक्कम स्थितीत आहे. भारत आणि मॉरिशसदरम्यान द्विपक्षीय व्यापार 2005-06 मध्ये 207 दशलक्ष डॉलरचा होता. 2019-20 पर्यंत तो वाढून 690 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचला. ही वृद्धी 233 टक्के इतकी आहे. मॉरिशसमध्ये भारताची निर्यात याच अवधीत 199 दशलक्ष डॉलरवरून वाढून 662 दशलक्ष डॉलरवर पोहोचली. आयात सात दशलक्ष डॉलरवरून वाढून 28 दशलक्ष डॉलरवर पोहोचली. आता मॉरिशसबरोबर झालेला मुक्त व्यापाराचा करार हा आफ्रिकेबरोबरील भारताच्या व्यापारी संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहेच, शिवाय हिंदी महासागरातील भूराजकीय स्थितीच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरणार आहे.
जानेवारी 2021 मध्ये चीननेही मॉरिशसबरोबर मुक्त व्यापाराचा करार केला आहे. चीनचा मॉरिशससोबत द्विपक्षीय व्यापार 2018 मध्ये 185 अब्ज डॉलर होता तो 2020 मध्ये 192 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव हे भारतासाठी मोठे आव्हान आहे. मॉरिशसबरोबर भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी जयशंकर यांनी मॉरिशससाठी 100 दशलक्ष डॉलरच्या कर्जाचीही घोषणा केली आहे. एका करारांतर्गत एक डोर्नियर विमान आणि एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर दोन वर्षांसाठी मॉरिशसला भाडेकरारावर दिले जाईल. मॉरिशसची सुरक्षा हीच भारताची सुरक्षा आहे, हे या घडामोडीतून सूचित होते.
यासंदर्भाने पाहिल्यास, हिंदी महासागराच्या क्षेत्रात भारताने आपली भूमिका वाढवायला हवी. भारत या क्षेत्रात “शुद्ध सुरक्षितता प्रदाता’ ही भूमिका बजावण्याची इच्छा व्यक्त करतो आणि गरजेच्या वेळी हिंदी महासागरातील देशांना भारताने सातत्याने मदतही केली आहे. कोविड-19 च्या लशीसंदर्भातच बोलायचे झाले तर भारताने केवळ मॉरिशसलाच नव्हे तर भारतीय नौदलाच्या जहाजांनी हिंदी महासागरातील अन्य देशांनाही आरोग्यविषयक सामग्रीची मदत केली आहे. जयशंकर यांनी त्यांच्या दौऱ्यावेळी कोविडच्या लशींचे एक लाख डोस मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या स्वाधीन केले. भारताने यापूर्वी एक जानेवारीला एक लाख डोस दिले होते. आता मॉरिशसने अतिरिक्त दोन लाख डोस देण्यासाठी विनंती केली आहे.
भारतातील अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, मॉरिशसचे एजलेगा द्वीप आणि सेशेल्समधील अजंपशन द्वीपांबरोबरच भारत आपली सुरक्षितता आणि सीमा अधिक सुदृढ बनविण्यासाठी हिंदी महासागरातील अधिकांश देशांमध्ये पोहोचण्यास इच्छुक आहे. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या सर्व देशांशी भारत संबंध दृढ बनवीत आहे. हिंदी महासागरातील देशांबरोबर व्यापारी आणि आर्थिक संबंध सुदृढ होणे भारताच्या दृष्टीने हितावह आहे. तसेच भारत-मॉरिशस मुक्त व्यापार करार हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
भारत-मॉरिशस संबंध हे थेट गुंतवणुकीचा प्रवाह, व्यापारात वृद्धी, भारताशी मॉरिशसची वाढती निकटता, मॉरिशसमध्ये भारतातून होणारे स्थलांतर आणि तेथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची प्रगती अशा विस्तृत पायावर उभे आहेत. दोन्ही देशांसमोर जलवायू परिवर्तनासंबंधीची माहिती, सूचना येथपासून सागरी असुरक्षितता आणि धोक्यांपर्यंत अनेक समान मुद्दे आहेत आणि ती सर्वच जागतिक आव्हाने आहेत. भारताने अनेकदा मॉरिशसला आर्थिक, लष्करी तसेच व्यूहात्मकदृष्ट्या मदत केली आहे. अशा प्रकारे भारत हा मॉरिशसचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार, गुंतवणुकीचा मार्ग आणि हिंदी महासागरातील समान संस्कृती असलेला मित्रदेश आहे.
या पार्श्वभूमीवर हा करार मॉरिशसबरोबर संबंध अधिक विस्तारण्यासाठी हितकारक आहेच; शिवाय, हे संबंध अधिक उन्नत स्तरावर नेण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध मोठी उंची गाठतील, अशी आशा निर्माण झाली आहे.