लडाख : भारत आणि चीन यांच्यातील तणाव आता सीमेवर स्पष्ट दिसत आहे. कारण भारतीय सैनिक आता लडाखमधील फिंगर 4 वर पोहोचले आहेत. याठिकाणी भारतीय जवान चिनी सैनिकांशी आय-बॉल-टू-आय-बॉल म्हणजे अगदी समोरासमोर आहेत. फिंगर 4 वर चिनी सैनिकांनी आधीच ताबा मिळवला होता, आता भारतीय सैनिकही तिथे पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आता भारतीय सैन्याने तिथे अशा पोझिशनवर ताबा मिळवला आहे, जो फिंगर 4 पेक्षाही उंचीवर आहे. खरंतर चिनी सैनिक फिंगर 4 वरुन मागे हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे भारतीय सैनिकही तिथे पोहोचले आहेत. त्यामुळे पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही परिसरातही भारतीय सैनिकांनी मोठी कूच केली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्याने म्हटलं होतं की, पँगाँग-त्सो लेकच्या उत्तरेला सैनिकांच्या तैनातीला रि-अॅडजस्टमेंट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने पँगँग-त्सो लेकच्या दक्षिणेत ज्या ज्या टेकड्यांवर (गुरंग हिल, मगर हिल, मुखपरी, रेचिन ला) ताबा मिळवला आहे, तिथे तिथे आपल्या कॅम्पच्या चहूबाजूंनी वायर ऑब्स्टिकल लावल्या आहेत. ही ताराबंदी पार करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारच भारताने चिनी सैन्याला दिला आहे.
सोमवारी संध्याकाळी चिनी सैनिका याच्या अगदी जवळ आले होते आणि त्यांनी ताराबंदी काढण्याचा प्रयत्नही केला होता. यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना कठोर इशारा दिला आणि मागे हटले नाहीत तर परिणाम गंभीर होतील असेही म्हटले. यानंतर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार करुन भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परतु भारतीय सैनिकांच्या कठोर इशाऱ्यानंतर चिनी सैन्याला मागे हटावे लागले.
एका अंदाजानुसार, चीनचे सुमारे 50 हजार सैनिक पूर्व लडाखजवळ एलएसीवर तैनात आहेत. भारतानेही इथे मिरर-डिप्लॉयमेंट केली आहे, म्हणजेच चीनच्या बरोबरीने 50 हजार सैनिक तैनात केले आहेत. कारण ब्रिगेडियर स्तरावरील बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे येत्या काही दिवास कोअर कमांडर स्तरावरील बैठक होण्याची शक्यता आहे. लेहमध्ये हवाई दलाकडून नाईट कॉम्बॅट एअर पेट्रोलिंग सुरु आहे. म्हणजेच दिवसाच नाही तर राक्षीही हवाई दलाचे लढाऊ विमान निगराणी करत आहेत.