नवी दिल्ली – डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतातील साखर कारखान्यांनी 9.39 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. एक ऑक्टोबरपासून साखरेची निर्यात सुरु झाली असून आतापर्यंत निर्यात समाधानकारक झाली आहे. आगामी काळात चांगला भाव मिळेपर्यंत साखरेची निर्यात करण्यात येणार नसल्याचे साखर निर्यातदारांच्या संघटनेने म्हटले आहे.
भारत सरकारच्या अनुदानाशिवाय साखर कारखान्यांनी आतापर्यंत 33 लाख टन साखरेच्या निर्यातीचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी 9.39 लाख टन साखर प्रत्यक्षात परदेशात गेली आहे. जागतीक पातळीवर साखरेचे दर कमी झाले आहेत. सध्याच्या दारावर भारतीय निर्यातदारांना साखर निर्यात करणे परवडत नाही. त्यामुळे साखर कारखाने काही काळ निर्यात कमी पातळीवर ठेवणार आहेत.
गेल्या वर्षी भारतातील साखर कारखान्यांनी 72 लाख 30 हजार टन साखरेची निर्यात केली होती. सध्या काही राज्यात पाऊस पडल्यामुळे साखरेच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे साखरेचा पुरवठा बंदरावर करण्यामध्ये अडचणी येत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.