जम्मू -भारतीय सुरक्षा दलांनी सोमवारी महत्वपूर्ण कारवाई करत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला. त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ती मोहीम संयुक्तपणे राबवली.
जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत तैनात असणाऱ्या जवानांनी रविवारी रात्री उशीरा संशयास्पद हालचाली हेरल्या. दहशतवाद्यांचा गट भारतीय हद्दीत शिरकावाचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यानंतर घुसखोरीचा नापाक प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जवान आणि पोलीस सज्ज झाले.
दहशतवाद्यांना इशारा दिल्यावर त्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवान आणि पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सोमवारी पहाटे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.
मागील काही काळापासून घुसखोरीच्या प्रयत्नांत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दले आणखी सतर्क बनली आहेत. त्यातून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे बहुतांश प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.